Crime News Sarkarnama
विश्लेषण

Crime News : क्राईम सेन्स डु नाॅट क्रॉस; 'महाराष्ट्रात गुंडाराज'

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेले राज्य अशी प्रतिमा महाराष्ट्राची होत असताना केवळ चौकशी करू, कारवाई करू, अशा गुळमुळीत उत्तरांनी राज्यातील गुन्हेगारांवर वचक राहील काय ? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आणि त्याचा समाजमनावर परिणाम होताना दिसत आहे.

गुंतवणुकीत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात अशा प्रकारचा 'गुंडाराज' राज्याचे वाटोळे केल्याशिवाय राहणार नाही. फोन टॅपिंग प्रकरणात कोर्टाने गुन्हे रद्द केल्यानंतर तीन महिन्यांत रश्मी शुक्ला यांना राज्याच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालकपदाचा कार्यभार मिळाला. त्यांच्या नियुक्तींवर विरोधकांनी राळ उठविली असताना राज्यातील इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केल्यासारखेच आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पुण्यात गुंड शरद मोहोळची दिवसाढवळ्या हत्या झाली. गोळीबार करीत ही हत्या करण्यात आली. इतके वेपन्स येतात तरी कुठून ? राज्य गुप्तवार्ता विभागाला कानोकान खबर का होत नाही ? हा प्रश्न आहेच. क्राईम झाल्यानंतर नियंत्रणात आणणे, हे पोलिसांचे कर्तव्य असले तरी गुन्हा घडण्यापूर्वी पोलिसांनी काय केले, याची उत्तरे कोणी मागणार आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होतो. अशीच परिस्थिती कायम राहिली तर भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावावर राज्य सरकार बरखास्त करावे, अशी मागणी विरोधकांनी केली तर आश्चर्य वाटू नये, इतकी गुन्हेगारी राज्यात वाढली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गृहमंत्र्यांच्या पालकत्व असलेल्या जिल्ह्यातदेखील गुन्हेगारांचे अनेक ठिकाणी वर्चस्व आहे. केवळ पुण्यातील (Pune) ही परिस्थिती नसून राज्यात सर्वदूर अशीच परिस्थिती आहे. रोज लाखोंची गोवंशतस्करी, कोट्यवधीची गुटखा विक्री, ड्रग्जमाफियांचे सर्व धंदे सुरू आहेत. ड्रग्जमाफिया ललित पाटील याचे कोट्यवधीचे ड्रग्ज प्रकरण उजेडात आल्यापासून तर अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. शहराशहरात जमीन, फ्लॅट, घर, दुकाने, शाॅपिंग काॅम्प्लेक्स खाली करून देण्यासाठी भूमाफियांनी पोसलेले गुंडदेखील समाजासाठी घातक असून समाजात कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारे आहे.

यांच्याविरोधात मोक्का लावण्याची गरज असताना अस्थिर राजकीय व्यवस्थेमुळे तसे होताना दिसत नाही. त्यामुळे 'महाराष्ट्रातील गुंडाराज' वाढला आहे. त्यामुळे सभ्य समाजात याविषयी तीव्र संताप असून तो भविष्यातील निवडणुकीत व्यक्त झाल्यास त्याचा फटका कोणाकोणाला बसेल, हे सांगता येणार नाही.

पोलिसांच्यादेखत कोयता गँगचे होणारे हल्ले, आमदाराची पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण, स्टेजवरून मंत्रीच लाठीचार्ज करण्याचे खुलेआम देत असलेले आदेश हे सर्व एखाद्या 'फिल्मी स्टोरी'प्रमाणे राज्यात सुरू आहे. यातील एक एक कथानक एकत्र केले तर तीन तासांचा 'पिक्चर' होईल इतकी मसालेदार स्टोरी 'महाराष्ट्र गुंडाराज' मध्ये तयार होईल, अशी स्थिती राज्यात आहे.

यंदाचे संपूर्ण वर्ष निवडणुकीचे आहे. निवडणुकीत राजकीय विरोधक तर आमने-सामने उभे असतील, त्याचबरोबर क्राईम नियंत्रणात नसेल तर राज्यातील 'गुंडाराज' व्यवस्थेवरचा विश्वास उडविल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा वेळीच सावध होत महाराष्ट्रातील 'क्राईम कंट्रोल' हा महत्त्वाचा विषय हाती घेण्याची गरज आहे, तरच समाज चिंतामुक्त असेल.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT