Vasantdada Patil, Patangrao Kadam, RR Patil, Anil Babar Sarkarnama
विश्लेषण

Sangli Politics : लोकनेत्यांची अकाली एक्झिट अन् पोरका झालेला सांगली जिल्हा

सरकारनामा ब्यूरो

विद्याधर कुलकर्णी

Sangli : महाराष्ट्र म्हणजे खरंतर लोकनेत्यांची खाण म्हटली पाहिजे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, माजी विरोधी पक्षनेते दि. बा. पाटील, गोपीनाथ मुंडे अशी कितीतरी नावे घेता येतील. तरीही सांगली जिल्ह्याला लोकनेत्यांचा वारसा लाभला आहे, असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (Vasantdada Patil), राज्याचे उपमुख्यमंत्री व दीर्घकाळ गृहमंत्री असणारे आर. आर. पाटील तसेच राज्य मंत्रिमंडळात विविध मंत्रिपदांवर काम केलेले डॉ. पतंगराव कदम आणि आमदार अनिल बाबर (Anil Babar) असे दिग्गज लोकनेते या जिल्ह्याने संपूर्ण राज्याला दिले.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना या सर्वच नेत्यांनी लोकांना आपलेसे केले. पूर्वाश्रमीचे मुख्यमंत्री वयोमानानुसार निवर्तले. अलीकडच्या काळात आर. आर. पाटील, डॉ. पतंगराव कदम आणि आमदार अनिल बाबर यांना मात्र काळाने हिरावून नेले. या सर्व लोकनेत्यांचे अकाली निधन झाले. या सर्वांनीच जनतेमध्ये जाऊन त्याचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी जीवाचे रान केले होते. त्यांची हीच भूमिका आणि कार्यपद्धती यावरून जिल्हातील लोकांप्रती त्यांची तळमळ दिसून येत होती.

राजकारणात सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांनासुद्धा मोठं करणारे राजकारणी किंवा नेते फार तुरळक दिसतात. त्यातीलच हे अलौकिक हिरे होते. सभ्यता आणि सुसंस्कृता यांनी संपूर्ण राज्याला दाखवून दिली. कधीही वैयक्तिक राग-द्वेष न ठेवता सर्वांशी राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी संबंध प्रस्थापित केले. कोणत्याही नेत्यांवर टीकाटिप्पणी करत असताना त्यांच्या घराण्यावर किंवा घरातील व्यक्तीवर कधीही आगपाखड केली नाही. सर्व गुणधर्म इथल्या मातीचा असल्यानं कधी त्यांचा पक्ष किंवा पक्षीय राजकारण आडवं आलं नाही.

सत्ता असताना आणि नसताना सुद्धा या सर्व लोकनेत्यांनी आपल्या भागातील विकास थांबू दिला नाही. त्या वेळेच्या सत्ताधाऱ्यांकडून स्थानिक विकासकामे त्यांनी आपल्या राजकीय कौशल्यानं पूर्णत्वास नेली. जिल्ह्यातील विकासामध्ये कधीही खंड पडू दिला नाही. जिल्ह्यातील लोकांना त्यांनी कधीच अंतर दिलं नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता जिल्ह्यात नवनवीन नेते उदयास येत आहेत. असं असले तरी लोकनेत्यांची कमतरता जाणवते. कारण यांची जनतेशी इतकी घट्ट नाळ जुळली होती की त्याची विभागणी करणे केवळ अशक्य आहे. इतके त्यांनी परिश्रम केले होते. स्वतःपेक्षा आपल्या मातीतील माणसं मोठी झाली पाहिजे. त्यांना सर्व सोयीसुविधा मिळायला पाहिजेत, असा त्यांचा विचार असायचा. कोणत्याही संकटाशी सामना करण्याची हिम्मत ते सर्व जनतेला देत होते. कोणत्याही लोभ आणि लाभासाठी त्यांनी काम केलं नाही. कायम जनतेच्या हिताचाच विचार केला. म्हणूनच जनतेनं त्यांना लोकनेते पदवी बहाल केली.

आर. आर. आबांनी (R. R. Patil) गृहमंत्री असताना या सांगली जिल्ह्यात (Sangli) तूरची येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरू केले होते. यामुळे याठिकाणी पोलिस अधिकारी वर्गाची ओळख संपूर्ण राज्याला पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे पतंगराव कदम (Patangrao Kadam) यांनीही वनमंत्री असताना कुंडलला भारताच्या नकाशावर आणले. वन खात्यातील कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्यांना सेवापूर्व प्रशिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातील एकमेव कुंडल या ठिकाणी विकास प्रशासन आणि व्यवस्थापन प्रबोधिनी (वने) ही संस्था स्थापन केली. या संस्थेत प्रत्येक वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना 18 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. या केंद्राचे पूर्ण संचलन डेहराडून (उत्तराखंड) येथून चालते. पतंगराव कदम यांची दूरदृष्टी या कार्यातून दिसून येते.

आमदार अनिल बाबर यांचीही गणना त्याच पद्धतीने होते. त्यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे विविध उप कार्यालय तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये निर्माण करण्यास सरकारला भाग पाडले. कारण पूर्व भागातील सर्वच तालुके हे कायम दुष्काळाने होरपळत होते. त्यामुळे त्या ठिकाणची पाण्याची वस्तुस्थिती समजण्यास मदत होवू लागली. त्यातून तातडीने त्यावर अंमलबजावणीही केली जात होती. त्यांची दूरदृष्टी आणि विकासाची भूमिका होती.

या सर्व संस्था आणि केंद्रामुळे रोजगारनिर्मिती झाली. या ठिकाणचा उद्योग व्यापारात वाढ झाली. अशी अनेक कामे त्यांनी या सर्वच भागामध्ये उभी केली आणि त्यांच्यावर कायम लक्ष ठेवले. अशा लोकनेत्यांची या पुढच्या काळात प्रकर्षाने उणीव जाणवणार आहे. कारण त्यांनी स्वतःपेक्षा जनतेसाठी आणि जनतेच्या कामासाठी मेहनत घेतली.

वरील सर्वच नेत्यांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना किंवा घराण्यामध्ये कोणतेही राजकीय पाठबळ नसताना संपूर्ण राज्याला जबाबदार मंत्री व आमदार कसा असतो, याचा आदर्श घालून दिला. राजकारण करत असताना मतदार आणि विरोधक यांच्याशी कसे संबंध असले पाहिजेत, याचीच जाणीव त्यांनी करून दिली. कायम सभ्य, संयमी आणि अभ्यासपूर्ण बोलणे हे यांच्याकडून शिकले पाहिजे.

सत्ता असताना आणि नसताना सुद्धा आपले वर्तन कसे असावे, हे त्यांनी नवीन तरुणांना आपल्या कार्यातून आणि वाणीतून दाखवून दिले. नुसते पद घेऊन आणि बाष्कळ बडबड करून आपण लोकात आपले अस्तित्व निर्माण करू शकत नाही, हेच वास्तव वरील नेत्यांनी दाखवलं!

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT