Rajesh Kshirsagar Sarkarnama
विश्लेषण

Rajesh Kshirsagar : शिंदे गटाचा नेता हे काय बोलून गेला! दोन नंबरचे व्यवसाय,मग सतेज पाटलांना भाजपमध्ये...!

अय्यूब कादरी

Rajesh Kshirsagar News : गैरव्यवहार, घोटाळ्यांचे आरोप असलेल्या बड्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जातो,त्यानंतर त्यांच्या मागचा कारवाईचा ससेमिरा टळतो, अशी टीका सातत्याने केली जाते. यात मोठ्या प्रमाणात तथ्य आहे. आधी आरोप करायचे आणि मग संबंधित नेता भाजपमध्ये आला की शांत व्हायचे, असे अनेक प्रकार महाराष्ट्राने,देशाने पाहिले आहेत. आता बोलण्याच्या ओघात शिवसेनेच्या (शिंदे गट) एका नेत्याने याची पुष्टी दिली आहे.

माजी मंत्री सतेज पाटील हे कोल्हापूरचे काँग्रेसचे महत्वाचे नेते आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना सतेज पाटील यांनी बेरजेचे राजकारण करत काही निवडणुका जिंकल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या विरोधकांच्या नाकीनऊ आले होते. पुढे महाविकास आघाडीचे सरकार पडले. त्यापूर्वी त्यांचे विरोधक धनंजय महाडिक यांची राज्यसभेवर वर्णी लागली.

राज्यात युतीचे सरकार आले. त्यामुळे साहजिकच सतेज पाटील (Satej Patil) यांच्या विरोधकांना बळ मिळाले. असे असले तरी सतेज पाटील यांना विरोधक हलक्यात घ्यायला तयार नाहीत, हे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष,शिवसेनेचे (शिंदे गट) नेते राजेश क्षीरसागर यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यावरून लक्षात येते.क्षीरसागर यांनी पाटील यांच्यावर केलेल्या आरोपामुळे भाजपचीच अधिक अडचण होण्याची, लोकांच्या मनातील समजावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटातील सात खासदार कमळ चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढायला तयार झाले आहेत, असे वक्तव्य सतेज पाटील यांनी केले होते. त्यामुळे खळबळ उडाली होती. पाटील यांचे विधान खोडून काढण्यासाठी शिंदे गटाचे काही नेते समोर आले. त्यात राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांचाही समावेश होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सतेज पाटील यांना 'करारा जवाब' देण्याच्या नादात क्षीरसागर काय बोलून गेले, याची उपरती त्यांना नंतर नक्कीच झाली असणार. सतेज पाटील यांचे दोन नंबरचे व्यवसाय आहेत, त्यातून वाचण्यासाठी त्यांना पळता भुई थोडी झाली आहे, असा आरोप क्षीरसागर यांनी केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर या सर्व प्रकारांतून वाचण्यासाठी ते लवकरच भाजपमध्ये जातील, असेही क्षीरसागर म्हणाले. याचा अर्थ काय घ्यायचा, हे कोणालाही समजावून सांगण्याची गरज नाही.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे 21 नोव्हेंबर 2021 रोजी निधन झाले. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांना पराभूत केले होते. जाधव यांच्या निधनानंतर त्या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली होती. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. सतेज पाटील मंत्री होते. पोटनिवडणूक लढवण्याची क्षीरसागर यांची इच्छा होती, मात्र ती पूर्ण झाली नव्हती.

महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सोडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी द्यावी, ही सतेज पाटील यांची मागणी उद्धव ठाकरे यांनी मान्य केली होती.निवडणूक अत्यंत चुरशीची झाली.सतेज पाटील यांनी आपले कसब पणाला लावून जयश्री पाटील यांना विजयी केले होते. त्यावेळेसपासून राजेश क्षीरसागर उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना राज्यसभेचीही उमेदवारी दिली नव्हती. उद्धव ठाकरे यांच्या एका शब्दावर मी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ सोडला होता, तरीही राज्यसभेसाठी माझा विचार केला गेला नाही, अशा शब्दांत क्षीरसागर यांनी नाराजी व्यक्त केली होती.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर क्षीरसागर अर्थातच शिंदे गटात दाखल झाले. ते राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आहेत. शिंदे गटाचे सात खासदार कमळ चिन्हावर लढणार, अशी पक्की माहिती आपल्याला मिळाली आहे, हे सतेज पाटील यांचे वक्तव्य शिंदे गटासह क्षीरसागर यांच्या जिव्हारी लागले. पाटील यांना उत्तर देताना क्षीरसागर यांना आपण काय बोलतोय, हे कदाचित लक्षात आले नसेल.

क्षीरसागर म्हणाले, 'सतेज पाटील यांचे दोन नंबरचे व्यवसाय आहेत. मोदी सरकारमध्ये त्यांना तसे काही करता येणार नाही. देशातून मोदी सरकारची सत्ता जाणार नाही. त्यातून वाचण्यासाठी त्यांच्याही (सतेज पाटील) भाजपमध्ये (BJP) जाण्यासाठी हालचाली सुरू आहेत. सतेज पाटील लवकरच भाजपमध्ये जातील, असे माझ्या कानावर आले आहे.'' तुमचे व्यवसाय दोन नंबरचे असतील तर त्यातून वाचण्यासाठी तुम्हाला भाजपमध्ये प्रवेश करावा लागतो, असे क्षीरसागर यांनी स्पष्टच सांगून टाकले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT