MP Shrikant Shinde, CM Eknath Shinde Sarkarnama
विश्लेषण

CM Eknath Shinde : शिंदेसाहेब, आता हीच वेळ! लोकसभा निवडणुकीतच करून दाखवा...

Rajanand More

Shiv Sena : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घराणेशाही मोडीत निघाल्याची प्रतिक्रिया दिली. त्यावर शांत बसतील ते संजय राऊत कसले. खासदार राऊतांनीही मग भात्यातील बाण काढत मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंवर सोडला. आता हा बाण खरंच वर्मी लागणार की भाजपच्या घराणेशाहीची व्याख्या पुढे करत ‘वारसदार’ सुरक्षित राहणार, हे काही दिवसांच समजेल.

नार्वेकरांच्या निकालानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली. घराणेशाहीच्या बळावर आपण लोकांवर हवे ते लादू शकतो असा समज असलेल्या लोकांचा गैरसमज या निर्णयाने कायमचा दूर केला आहे. आजच्या निकालावरून एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली आहे, असे शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकारणातील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा तापला आहे. शिंदेना प्रत्युत्तर देताना राऊतांनी (Sanjay Raut) श्रीकांत शिंदे तुमचे पुत्र नाहीत हे सिध्द करा, असं प्रत्युत्तर दिले.

श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे कल्याण लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघाचे खासदार आहेत. पक्षातही त्यांच्या शब्दाला किंमत वाढली आहे. अनेक पक्षांतर्गत बैठका, कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती प्राधान्याने असल्याचा दावा विरोधक करतात. राज्यभरातील पक्षाचे मेळावे, सभांमध्येही त्यांचे स्थान वरचे असते. एकनाथ शिंदे यांच्यानंतर सर्वाधिक मागणीही श्रीकांत शिंदेंनाच असल्याची चर्चा आहे. त्यांच्या शब्दाला किंमत वाढली असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच केवळ लोकसभा मतदारसंघापुरताच श्रीकांत शिंदेंचा दबदबा नसून तो पक्षातही वाढल्याचे चित्र आहे. त्यावरच राऊतांनीही बोट ठेवले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रताप सरनाईक, रामदास कदम यांचे पुत्र, उदय सामंत यांचे बंधू यांसह आणखी काही नेत्यांची नावे घेतला येतील, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य शिवसेनेत सक्रीय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अनेक भाषणांमध्ये घराणेशाहीवरून विरोधकांवर टीका केली जाते. पण त्यांच्या घराणेशाहीची व्याख्या वेगळी आहे. ते केवळ पक्षांतर्गत घराणेशाहीवर बोलतात. निवडणुकांमध्ये क्षमता असलेला घरातील उमेदवार दिल्यास ती घराणेशाही नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे कोणत्या वाटेवर जाणार, याबाबत मतदारांकडूनच प्रश्न उपस्थित केले तर त्याला कसे उत्तर देणार, याबाबत उत्सुकता आहे.

ही मनमानी नाही का?

लोकशाहीत राजकीय पक्षही लोकशाही पध्दतीनेच चालले पाहिजेत, पक्षाध्यक्ष सुध्दा मनमानी करू शकत नाही. सत्तेसाठी विचारांची मोडतोड करून, अनैसर्गिक आघाड्या करून आणि विश्वास पायदळी तुडवून त्यावर ताठ मानेने उभे राहण्याचा घोर अपराध करणाऱ्या नेत्यांना या निकालाने धडा दिल्याचेही शिंदे यांनी कालच्या निकालावर म्हटले आहे.

राष्ट्रवादीकडून शिवसैनिकांचे खच्चीकरण केल्याचा मुद्दाही शिंदेंनी बंड करताना मांडला होता. नंतर त्याच राष्ट्रवादीला त्याच शिंदेंनी सोबत घेतले. शिंदेंसोबत बंड केलेल्या आमदारांनी कदाचित हा राजकीय डाव माहितीही नसावा. त्यामुळेच अनेकांनी उघड नाराजीही व्यक्त केली. मग ही मनमानी नाही का, सत्तेसाठी विचारांची मोडतोड नाही का, अनैसर्गिक आघाडी नाही का, विश्वास पायदळी तुडवला नाही का, असे अनेक प्रश्न निकालानंतर उपस्थित केले जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT