

Shailesh Agrawal controversy explained: चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे उमेदवार शैलेश कुमार अग्रवाल यांनीउमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर या निवडणुकीने नवे राजकीय वळण घेतले. त्यांच्या माघारीमागील कारणांबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
शैलेश अग्रवाल यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वावर गंभीर आरोप करत संघटनात्मक कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणुकीदरम्यान पक्षातील काही नेत्यांनी अधिकृत उमेदवाराला अपेक्षित पाठबळ न देता उलट त्यांची राजकीय ताकद कमी करण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.
अहिंसा शिबिराला येतात, ' जय जगत' म्हणत गांधी टोपी घालता आणि मटणाच्या पार्ट्या करायला वर्ध्यात कोणत्या नेत्यांच्या घरी जातात, याची माहिती वरिष्ठांना देणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. विजय वडेट्टीवारांनी परवानगी दिली तर सपकाळाचं सगळचं बाहेर काढेल, असा इशारा त्यांनी दिला.
परिस्थितीने माघार घ्यायला लावली, प्रदेशाध्यक्ष म्हणून समोर आले असते तर बरं झालं असतं. जितक्या फटाफट प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी यानी माझं सस्पेन्शन काढलं, नंतर टर्मिनेट करायला पाहिजे होतं. प्रदेशाध्यक्षांचे कटकारस्थान जर मी उघडे केले तर यांनी माझा विरोध करणं स्वाभाविक आहे. प्रदेशाध्यक्षांची वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा शैलेश अग्रवाल यांनी दिला.
अग्रवाल यांनी काही नेत्यांवर मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणे, पक्षातील कार्यकर्त्यांना दूर ठेवणे आणि निवडणुकीच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण केल्याचे आरोप केले. निवडणुकीतील पराभव किंवा अपेक्षित यश न मिळण्यामागे विरोधी पक्षांपेक्षा पक्षांतर्गत गटबाजीच अधिक कारणीभूत असल्याचा दावा त्यांनी केला.
त्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरही थेट टीका केली. पक्षात योग्य निर्णयप्रक्रियेचा अभाव असल्याचे सांगत अनेक महत्त्वाचे निर्णय स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांशी चर्चा न करता घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षातील शिस्तभंगाच्या कारवाईबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
स्वतःवरील निलंबनाच्या कारवाईचा उल्लेख करत अग्रवाल म्हणाले की, “माझे निलंबन मागे घेण्यासाठी मी कोणाकडेही विनंती करणार नाही. पक्षाला योग्य वाटत असेल तर त्यांनी पुढील निर्णय घ्यावा. मी माझी भूमिका स्पष्ट केली असून पक्ष सोडण्याचाही निर्णय जाहीर केला आहे.”
काही वरिष्ठ नेत्यांच्या कार्यपद्धतीबाबत आणि निवडणुकीदरम्यान घडलेल्या कथित घटनांबाबतची माहिती पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचविणार असल्याचेही त्यांनी सूचित केले. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर उफाळून आलेल्या या वादामुळे राज्यातील काँग्रेस संघटनेसमोर नवे आव्हान निर्माण झाले असून पक्ष नेतृत्व या घडामोडींवर काय भूमिका घेते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.