

AAP internal crisis : आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील दहा पैकी सात खासदारांनी बंड केले आहे. अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी त्यांनी स्वतंत्र गट केला असून तो भाजपमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. सात खासदार गेले असले तरी अजून तीन खासदार त्यांच्यासोबत असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेतून उपनेतेपदावरून हटविल्यापासून त्यांच्या पक्षासोबतचे संबंध ताणले गेले होते. त्याचवेळी त्यांनी आपमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले होते. अखेर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पण ते आपल्यासोबत पक्षाच्या इतर सहा खासदारांनाही घेऊन गेले आहेत.
चड्ढा यांच्यासह अशोक मित्तल, संदीप पाठक, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, विक्रम सहानी आणि राजेंद्र गुप्ता या खासदारांनीही आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तर संजय सिंह, संत बलबीर सिंग आणि नरेन दास गुप्ता हे तिघे अजूनही केजरीवालांसोबत आहेत. संजय सिंह हे अत्यंत आक्रमक नेते मानले जातात. राज्यसभेतील त्यांची भाषणे सत्ताधारी पक्षावर आसुड ओढणारी असतात. त्यामुळे केजरीवालांसाठी अजूनही त्यांच्यासारखा नेता असल्याने काही दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, चड्ढा यांच्यासह राजेंद्र गुप्ता, अशोक मित्तल, संदीप पाठक आणि हरभजन सिंग या खासदारांची राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत एप्रिल २०२८ मध्ये संपणार आहे. तर स्वाती मालीवाल या २७ जानेवारी २०२३ पर्यंत राज्यसभेच्या सदस्य असतील. या सर्वांची ही पहिलीच टर्म आहे. तर विक्रम सहानी यांची टर्म ४ जुलै २०२८ पर्यंत आहे. तेही पहिल्यांदाच खासदार झाले आहेत.
मालीवाल वगळता हे सर्वजण पंजाबचे प्रतिनिधित्व करतात. दिल्लीचे प्रतिनिधित्व करणारे संजय सिंह आणि नरेन दास गुप्ता यांची ही दुसरी टर्म आहे. तेही २७ जानेवारी २०३० पर्यंत खासदार असतील. पंजाबमधील संत बलबीर सिंग हे ४ जुलै २०२८ पर्यंत आपचे राज्यसभेतील सदस्य असतील.