

Umar Khalid: टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस अर्थात TISS या नामवंत संस्थेमध्ये आयोजित एका कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी गेल्या सहा वर्षांपासून तुरुंगात असलेल्या उमर खालिद आणि शरजील इमाम या जेएनयूच्या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी घोषणाबाजी केली होती. यामुळं मोठा गोंधळ निर्माण झाला होता, त्यानंतर या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, ७ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत मुंबईच्या सेशन्स कोर्टानं या दोन विद्यार्थ्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे (जेएनयू) विद्यार्थी असलेले उमर खालिद आणि शरजील इमाम या दोघांवर दिल्लीतील दंगल प्रकरणाच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपांवरुन UAPA कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून गेल्या पाच वर्षांपासून त्यांना दिल्लीच्या तिहार तुरुंगात ठेवण्यात आलं आहे, विशेष म्हणजे त्यांच्याविरोधात अद्याप खटला देखील सुरु झालेला नाही. त्यामुळंच या दोघांची सुटका करण्यासंदर्भात घोषणाबाजी TISSच्या विद्यार्थ्यांनी केली होती. या संस्थेच्या परिसरात ऑक्टोबर २०२५ मध्ये दिवंगत प्रा. जीएन साईबाबा यांचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी हा प्रकार घडला होता.
त्यावेळी पोलिसांनी अशी घोषणाबाजी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांवर मुंबई पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आला होता. या एफआयआरमध्ये प्रा. साईबाबा यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात सहभागी होणे, त्यांच्या कवितांचं वाचन करणे आणि शरजील आणि खालिद यांच्या सुटकेची घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे. यावर या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की, "साईबाबा यांना UAPA च्या खटल्यातून मुक्त करण्यात आलं होतं, तसंच केवळ शरजील इमाम आणि उमर खालिद यांची सुटका करा अशी मागणी करणं हा गुन्हा होत नाही"
यावर अतिरिक्त न्यायाधीश व्ही. बी. बोहरा यांनी म्हटलं की, सुप्रीम कोर्टानं इमाम आणि खालिद यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी देशाच्या कायद्यांचा सन्मान करायला हवा, असं सांगत अभिरुप पॉल (वय ३२), कामाख्या प्रसाद दास (वय २३) या दोघांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. न्यायाधिशांनी म्हटलं की, यात शंका नाही की प्रा. साईबाबा हे युएपीएच्या आरोपांतून मुक्त झाले होते. त्यामुळं त्यांचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम करण्यात काहीही गैर नाही. पण हा कार्यक्रम केवळ इतक्यावरच मर्यादित नव्हता तर त्यांनी उमर खालिद आणि शरजील इमाम यांची तुरुंगातून सुटका करण्याच्या घोषणाही केल्या. या दोघांविरोधात सध्या युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल आहे. अशा घोषणा देण्याचं हे व्यासपीठ नव्हतं. इतरही कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये, आंदोलनांमध्ये अशा घोषणा दिल्या जाऊ शकत नाहीत. सुप्रीम कोर्टानंही त्यांचा जामीन रद्द केला होता, त्यामुळं विद्यार्थी या नात्यानं त्यांनी देशाच्या कायद्यांचा सन्मान करायला हवा.
त्याचबरोबर या विद्यार्थ्यांनी प्रा. साईबाबा यांना श्रद्धांजली वाहताना 'रेस्ट इन पीस' म्हणण्याऐवजी 'रेस्ट इन पावर' अशा घोषणाही दिल्या, हे आक्षेपार्ह आहे, असं कोर्टानं म्हटलं आहे. तसंच या दोन विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये CPI (माओवादी) या भारतात बंदी असलेल्या राजकीय पक्षाच्या काही लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या डाऊनलोड प्रति मिळाल्या आहेत. या पुस्तकांवर बंदी जरी नसली तरी या पुस्तकांमध्ये देशाच्या विभाजनाबाबत मजकूर असल्याचं निरिक्षण कोर्टानं नोंदवलं आहे.
यासर्व पार्श्वभूमीवर उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्या सुटकेच्या घोषणा देण्यामागे या विद्यार्थ्यांचा नेमका काय उद्देश आहे? हे तपासण्यासाठी दोघांना पोलीस कोठडीत चौकशी करणं गरजेचं असल्यानं त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असल्याचं स्पष्टीकरण मुंबईच्या सत्र न्यायालयानं दिलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.