
Bihar News: बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात 'एसआयआर'वरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.गेल्या महिन्याभरापासून बिहारसह देशाचे राजकारण ढवळून काढलेल्या SIR चा म्हणजेच मतदार पुनर्पडताळणी मोहिमेत तब्बल 65 लाखांहून अधिक मतदारांचा ठावठिकाणाच सापडत नसल्याचं आयोगानं स्पष्ट केलं आहे.
याचवरुन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांच्याकडून मतदार याद्यांमध्ये घोळ केल्याचा तसेच सामान्य लोकांच्या मतदानाचा अधिकार हिरावून घेतल्याचा आरोप भाजपवर होत आहे. आता भाजपकडूनही या आरोपांवर जोरदार पलटवार करण्यात आला आहे.
भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मंगळवारी(ता.19) एक व्हिडिओ शेअर करत बिहारमधलं राजकारण पुन्हा एकदा तापवलं आहे. या व्हिडिओद्वारे नड्डा यांनी राहुल गांधी यांच्या मतदार याद्यांमध्ये घोळाच्या आरोपातील हवाच पूर्णपणे काढून टाकली आहे.
भाजपच्या जेपी नड्डा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओला ‘मैं अभी भी वहीं खड़ा हूं… जहां मेरा झूठ पकड़ा गया,सच सामने आया,और मैंने खुद को मूर्ख बनाया… मैं अभी भी वहीं खड़ा हूं’ अशी कॅप्शन दिलं आहे.या व्हिडिओद्वारे नड्डा यांनी राहुल गांधींना दिलेला झटका राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांच्याकडून बिहारमध्ये सध्या मतदार अधिकार यात्रा काढण्यात आली आहे.याच यात्रेदरम्यान,राहुल गांधी यांच्याशी संवाद साधताना रंजू देवी नावाच्या महिलेकडून तिच्या कुटुंबातील सहा सदस्यांची नावं मतदार यादीतून कट झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.मात्र,याच दाव्याबाबत जेपी नड्डा यांनी मोठी धक्कादायक माहिती उघडकीस आणली आहे.
नड्डा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रंजू देवी या महिलेच्या तक्रारीनंतर करण्यात आलेल्या तपासामध्ये संबंधित दावा खोटा असल्याचं सत्य समोर आलं आहे.रंजू देवी आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं या मतदार यादीमध्ये आहेत,कोणाचंही नाव मतदार यादीमधून वगळण्यात आलेलं नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
बिहारमधील रोहतास या जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या रंजू देवी यांनी राहुल गांधींशी बोलताना मला आमच्या वार्ड सचिवांकडून सांगण्यात आलं होतं की, तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नाव मतदार यादीमध्ये नाहीयेत.त्यांनी मला राहुल गांधी आणि तेजस्वी यादव हे सध्या मतदार अधिकार यात्रेवर आहेत, त्यांच्याशी बोलून पुन्हा तुमची नाव मतदार यादीमध्ये जोडा असंही सांगितल्याचं रंजू देवी म्हणाल्या होत्या.
त्याचमुळे आपण राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली होती,असं संबंधित महिलेनं सांगितल्याचं वास्तव समोर आलं आहे. मात्र,जेव्हा आपण स्वत:ही मतदारयादी पाहिली, तेव्हा त्या यादीत माझं आणि माझ्या कुटुंबाचं नाव असल्याचंही रंजू देवी नड्डांनी शेअर केलेल्या व्हिडिओत सांगताना दिसून येत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 7 ऑगस्ट रोजी केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते.निवडणुकीत मत चोरी होत आहे आणि यात निवडणूक आयोगाचा सहभाग आहे.याचे पुरावे आमच्याकडे असून,हे सर्व भाजपच्या सांगण्यावरून होत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.
राहुल गांधींनी एकीकडे बिहारमध्ये एल्गार सुरु केला असतानाच निवडणूक आयोगानं टायमिंग साधले होते. नवी दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले होते. त्यासोबतच निवडणूक आयोगाला मत चोरीच्या आरोपांचे पुरावे मिळाले नसल्याचेही स्पष्ट केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.