

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाबाबत मागील काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे.
डी. के. शिवकुमार यांनी योग्य वेळी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगून संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे.
त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात तर्कवितर्क आणि उत्सुकता वाढली आहे.
bengaluru News : मागील काही महिन्यांपासून कर्नाटकातील मुख्यमंत्री बदलाबाबत चर्चा होत असतानाच आता डी. के. शिवकुमार यांनी योग्य वेळी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्रिपद बदलाबाबत मीच योग्य वेळी बोलणार आहे. त्याचे वेगवेगळ्या प्रकारे अर्थ लावू नका. थोडा संयम बाळगा, असे सांगितल्याने आता मुख्यमंत्रिपद बदलाबाबत उत्सुकता वाढविली आहे.
कर्नाटकात सध्या मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहत असून सिद्धरामय्या यांनी आपण काँग्रेस हायकमांडच्या निर्देशानुसारच काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी देखील दिल्ली दौऱ्याबाबत सूचक वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुंवया उंचावल्या होत्या. शिवकुमार यांनी दिल्ली दौऱ्याबाबत सूचक वक्तव्य केले. ज्यांनी आपल्याला दिल्लीला बोलावले आहे, त्यांना भेटत आहे. माझे कष्ट, दुःख, तक्रारी, आनंद आणि अपेक्षा त्यांच्याशी मोकळेपणाने मांडणार असल्याचे म्हटले होते.
त्यांच्या या वक्तव्यानंतर आता ते नवी दिल्लीत गेले असून ते कोणाला भेटले, तेथे काय झाले अशी अनेक चर्चा आता कर्नाटकात होताना दिसत आहे. त्यांच्या या वक्तव्याला २४ तास होत नाहीत. तोच शिवकुमार यांनी पुन्हा एकदा सूचक वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढवली आहे.
नवी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना शिवकुमार यांनी स्पष्ट केले की, त्यांनी अद्याप कोणत्याही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतलेली नाही. सध्या ते आसाम विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या भेटीबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘पक्ष कार्यालयात गेलो होतो. कोणाला भेटलो, काय चर्चा झाली, याबाबत वेगवेगळ्या व्याख्या करू नका. मीच योग्य वेळी बोलेन. थोडा वेळ थांबा.’
दरम्यान शिवकुमार यांचे बंधू आणि माजी खासदार डी. के. सुरेश यांनी बंगळूरमध्ये ‘मुख्यमंत्री सिद्धरामय्या दिलेले वचन पाळतील’ असे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवकुमार म्हणाले, ‘मी आधीच सांगितले आहे की, वेळच उत्तर देईल. माझ्या आणि सिद्धरामय्या यांच्यात काय चर्चा झाली आहे, हे आम्हा दोघांनाच माहिती आहे. पुढील काळात यावर बोलू. बोलण्याची वेळ केव्हा येईल, ते वेळच ठरवेल.’
तसेच केंद्र सरकारने सरकारी कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगान ‘वंदे मातरम्’ अनिवार्य करण्याच्या निर्णयावर बोलताना त्यांनी म्हटले की, ‘काँग्रेसनेच या देशात ‘वंदे मातरम्’चा पाया घातला आहे. राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि संविधान देशाला काँग्रेसने दिले. इतर जण आमचा आदर्श घेत आहेत.’
कर्नाटकात एस. एम. कृष्णा यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात राष्ट्रकवी कुवेंपू यांनी रचलेले ‘सर्व जनांगदा शांतीय तोटा’ हे गीत राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात आले, त्याची आठवण करून देत त्यांनी सांगितले की, या गीतात सर्व धर्मांचा सन्मान केला आहे. ‘हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम अशा सर्व धर्मांना आदर देणारी आमची परंपरा आहे. आमचे राज्य शांततेचे उद्यान आहे, असे ते म्हणाले.
राष्ट्रगीत, राष्ट्रगान अनिवार्य करणार?
सरकारी कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्’ दोन्ही सादर करण्याच्या अनिवार्यतेबाबत पुढील काळात चर्चा करू, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
1. कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाची चर्चा का सुरू आहे?
मागील काही महिन्यांपासून काँग्रेस नेतृत्वात संभाव्य बदलाबाबत राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
2. डीके शिवकुमार यांनी काय विधान केले?
ते म्हणाले की मुख्यमंत्रिपद बदलाबाबत योग्य वेळी ते स्वतः भूमिका स्पष्ट करतील.
3. त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काय लावला जात आहे?
राजकीय वर्तुळात नेतृत्व बदलाचे संकेत म्हणून विविध अर्थ लावले जात आहेत.
4. काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे?
याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
5. पुढील राजकीय घडामोडी काय असू शकतात?
पक्षांतर्गत चर्चेनंतर नेतृत्व बदलाबाबत स्पष्ट निर्णय जाहीर होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.