Loksabha Election 2024 : सध्या देशभरात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आतापर्यंत मतदानाचे चार टप्पे पार पडले आहेत. तर 20 मे रोजी पाचव्या टप्प्याचे मतदान पार पडणार आहे. दरम्यान, सत्ताधारी भाजप आणि एनडीए आघाडी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी जोर लावत आहे.
तर विरोधी पक्षांची इंडी आघाडी भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी प्रयत्नशील आहे. एकूणच दोन्ही बाजू आपली ताकद वाढवण्यासाठी धडपडत आहेत, नवीन पक्षाला आपल्या गोटात आणत आहेत. एकीकडे ही अशी राजकीय परिस्थिती असताना समाजवादी पार्टील दुहेरी झटका बसला आहे.
समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव(Akhilesh Yadav) यांचे जुने सहकारी आणि महान दलाचे अध्यक्ष केशव देव मौर्य यांनी नुकतीच समाजवादी पार्टीला दिलेला पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केली आहे. तर यापूर्वी जनवादी पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष संजय चौहान यांनीही समाजवादी पार्टीला भाजपची बी-टीम म्हणत पाठिंबा काढून घेतला होता. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अखिलेश यादव यांना दुहेरी झटका बसला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महान दलाचे अध्यक्ष केशव देव मौर्य यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे, जयंत चौधरी, स्वामी प्रसाद मौर्य आणि पल्लवी पटेल यांनी अखिलेश यादव यांची साथ सोडली तेव्हा मी समाजवादी पक्षाच्या पाठीशी पहाडासारखा उभा राहून पाठिंबा दिला होता. तसेच, या लोकसभा निवडणुकीत इंडी आघाडीने महान दलास आपल्या आघाडीत घेतले नव्हते. मात्र, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महान दलास पाठिंबा मागितला होता. महान दलाची कोणत्याही पक्षाशी आघाडी नव्हती आणि मोठी निवडणूक असल्याने महान दलाकडे कोणताही उमेदवारही नव्हता. म्हणून महान दलाने सपाला पाठिंबा दिला होता.
याचबरोबर कठीण परिस्थितीत जेव्हा जयंत चौधरी, स्वामी प्रसाद मौर्य आणि पल्लवी पटेल यांनी समाजवादी पक्ष सोडला तेव्हा मी समाजवादी पक्षाच्या पाठीशी खडकासारखा उभा राहून पाठिंबा दिला. पण निवडणुकीचा दुसरा टप्पा संपल्यानंतर समाजवादी पक्षाने बाबूसिंग कुशवाह यांचा पक्ष जन अधिकार पक्ष विलीन करून बाबूसिंग कुशवाह यांना जौनपूर लोकसभेचे उमेदवार केले. आत्तापर्यंत ठीक होते पण समाजवादी पक्षाने पुन्हा माझ्यासोबत 2022मधील तोच जुना खेळ सुरू केला जो स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासोबत खेळले होते. असंही केशव देव मौर्य यांनी सांगितले.
याशिवाय, मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण समाजवादी पक्षाचे प्रमुख मागील निवडणुकीप्रमाणेच अतिआत्मविश्वासीही झाले आहेत. लोकसभेच्या बहुतांश जागा आपण लाखो मतांनी जिंकत आहोत, असे त्यांना वाटते, त्यामुळे त्यांना आता महान दलाची गरज नाही. असं केशव देव मौर्या यांनी म्हटले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.