
कासगंज : बिहारमध्ये आयपीएस अधिकारी शिवदीप वामन लांडे यांची बरीच चर्चा असते. त्यांचे धाडस आणि काम बघून बिहार आणि महाराष्ट्रात त्यांना सिंघम म्हणूनही ओळखले जाते. लांडे यांच्यानंतर आता उत्तरप्रदेश निवडणुकांच्या धामधुमीत आणखी एक मराठमोळे अधिकारी चर्चेत आले असून तिथली गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी ते मोलाची भूमिका बजावत आहेत. कासगंज जिल्ह्यात वरिष्ठ पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रोहन बोत्रे(IPS Rohan Botre) यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
रोहन बोत्रे मूळचे पुण्याचे. पदवीचे शिक्षण पुण्यात झाले. नंतर त्यांनी परदेशात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतले. आता भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) कार्यरत आहे. यापूर्वी अलिगड, गोरखपूर आणि आग्रा येथे त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणून काम केले आहे. ते म्हणाले, राज्य सरकारने पोलिसांना दिलेले स्वातंत्र्य कारणीभूत ठरले आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर विशेष लक्ष सरकारने दिले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक विशेषत: महिला आणि तरुणी स्वतःला सुरक्षित समजू लागल्या आहेत.(IPS Rohan Botre News Updates)
बोत्रे पुढे म्हणाले, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत महिलांची सुरक्षितता हा प्रमुख मुद्दा आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांनीही या मुद्द्याचा वापर प्रचारात केला आहे. स्थानिक लोकांमध्येही या विषयी चर्चा आहे. उत्तरप्रदेशमध्ये "महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस दलाने चांगले काम केले आहे. त्यामुळे राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण अत्यल्प झाले आहे." पोलिस दलाने प्रत्येक ठाण्यात महिलांसाठी हेल्पडेस्क सुरू केला. ॲन्टी रोमिया स्कॉड स्थापन केले. महिलांसंबंधी जेवढ्याही गुन्हे घडतात, त्यातील आरोपींना कमी वेळात पोलिसांनी पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांविषयी जरब निर्माण झाली असून, गेल्या पाच वर्षांत गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे.
गुन्हेगारी घटनांचा तपशील तुम्ही पाहिला, तर त्यात मोठी अशी कोणतीही घटना तुम्हाला दिसणार नाही, असे बोत्रे यांनी सांगितले. एन्काऊंटरबाबत रोहन बोत्रे म्हणाले, की एन्काऊंटर होतात. ते स्वत:हून पोलिस करीत नाहीत. तशी परिस्थिती निर्माण झाली, तरच त्याबाबत निर्णय घेतला जातो. घटना घडल्यानंतर कमीत कमी वेळेत त्याचा छडा पोलिस लावत आहेत. त्याचा परिणाम राज्यात आता दिसून येत आहे. कायदा-सुव्यवस्था सुरळीत झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉक्टरचे अपहरण आणि सुटका
आग्रा येथे कार्यरत असताना एका डॉक्टरचे अपहरण झाले होते. त्यांना कॅन्सर आणि हृदयरोगही होता. त्यांच्याकडून पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. अपहरणकर्ते त्यांना राजस्थानच्या भरतपूर भागात घेऊन गेले होते. त्यावेळी आम्ही युद्धपातळीवर पोलिस अधिकाऱ्यांची सात-आठ पथके तयार केली. त्या भागात कोंबिंग ऑपरेशन केले आणि अवघ्या ३६ तासांत त्या डॉक्टरांची सुटका केली. अशा अनेक आव्हानात्मक कारवाया तडीस नेण्याची संधी मला मिळाली आहे, असेही रोहन बोत्रे अभिमानाने सांगतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.