Nepal Youth Protest : भ्रष्टाचार आणि समाज माध्यमांवरील सरकारने घातलेल्या बंदीविरोधात नेपाळमधील तरूणाई रस्त्यावर उतरली आणि त्यांनी देशात सत्तापालट केला. नेपाळमधील तरूणांचा संताप इतक्या टोकाला गेला की अखेर पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
मात्र, नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचारात माजी पंतप्रधान झालानाथ यांचे घर पेटवण्यात आले या आगीत त्यांच्या पत्नी राजलक्ष्मी यांचा मृत्यू झाला. तर पोलिसांच्या गोळीबारात 20 नेपाळी तरुणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमधील याच परिस्थितीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखमत्र असलेल्या सामनातून भारतातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात आला आहे.
नेपाळ सरकारने समाज माध्यमांवर सरकारविरोधी हवा पसरू लागली आणि लोकांत निर्माण झालेला असंतोष दाबण्यासाठी सरकारने थेट समाज माध्यमांवर बंदी घातली. त्यामुळे या सरकारच्या निर्णयाविरोधात नेपाळमधील तरूणाई आक्रमकपणे रस्त्यावर उतरली आणि भ्रष्टाचार बंद करा, सोशल मीडिया नाही' 'तरुण विरुद्ध भ्रष्टाचार' अशा घोषणा देऊ लागली. याचा अर्थ नेपाळ सरकारची हुकूमशाही, भ्रष्टाचार, मनमानी याविरुद्धचा हा आक्रोश आहे, असं सामनात म्हटलं आहे.
तसंच सामनात नेपाळमधील भ्रष्टाचार असह्य झाल्यामुळे जनता रस्त्यावर आल्याचं म्हटलं आहे. "देशात भ्रष्टाचाराची दलदल माजल्यानंतर भ्रष्ट सरकारविरुद्ध बंड करून रस्त्यावर येण्याची धमक तेथील जनतेत आहे. भारताच्या सीमेवरचे हे राष्ट्र आहे. सीमेवरील जवळ जवळ प्रत्येक राष्ट्रात बंडाळ्या माजल्या. श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तानात हेच चित्र आहे.
नेपाळमध्ये भूक, भय, भ्रष्टाचाराचे राज्य आहे व ते रोखण्यास तेथील राजकीय व्यवस्था कुचकामी ठरली. संसदेचा लोकांसाठी काहीच फायदा नाही. अशा वेळी देशाला हुकूमशाहीच्या बेड्यांतून सोडवण्यासाठी लोक मरायला तयार होतात. नेपाळमध्ये तेच घडत आहे. हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले व हिंसाचार झाला.
नेपाळ सरकारला हा उद्रेक रोखण्यासाठी शेवटी सैन्य उतरवावे लागले. नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला, पण जनतेला पंतप्रधान केपी ओली यांचा राजीनामा हवा होता. नेपाळात सातत्याने सरकारे येत आहेत आणि कोसळत आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार यांसाठी जनता त्रस्त आहे. भारतात मोठ्या प्रमाणात नेपाळची जनता रोजगार कमवीत आहे, पण नेपाळवर पूर्ण नियंत्रण आहे ते चीनचे.
नेपाळची अर्थव्यवस्था चीनच्या मदतीवर अवलंबून आहे.", असं म्हणत सामनातून नेपाळमधील स्थितीवरून भारताच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली आहे. सामनात लिहिलं की, एकेकाळी नेपाळ, भूतानसारखी राष्ट्रे भारताचे विश्वासू मित्र होती. नेपाळात नवे सरकार आले की, तेथील पंतप्रधान सगळ्यात आधी भारत भेटीवर येत. आज नेपाळचे पंतप्रधान आधी चीन दौऱ्यावर व नंतर पाकिस्तानात जातात.
हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे. शेकडो चिनी शिक्षक सध्या नेपाळात आहेत व नेपाळची जनता त्यांच्याकडून चिनी भाषेचे धडे घेत आहे. नेपाळचा रंग आधी भगवा होता. तो आता पूर्णपणे लालभडक झाला व भारत सरकार हा बदल रोखू शकले नाही. भारताने आमच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा घेतला आहे असा कांगावा करण्यापर्यंत नेपाळची मजल गेली ती भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर कमजोर पडल्यामुळेच.
एकेकाळी नेपाळचे राज्यकर्ते सांगत, आमच्या पाठीशी भारत आहे. भारत आमचा मोठा भाऊ आहे.’’ आज भारताची जागा चीनने घेतली आहे आणि नेपाळमध्ये असंतोषाचा वणवा पेटला असताना भारत कुंपणावर बसला आहे. नेपाळची आग ही भूक, बेरोजगारीतून पडलेली ठिणगी आहे. भारताने यापासून धडा घेतला पाहिजे. भारतातला रोजगार नष्ट झाला आहे.
80 कोटी लोकांना सरकार फुकटात देत असलेल्या पाच-दहा किलो ‘राशन’वर गुजराणा करावा लागत आहे. लोकशाहीचा मुडदा पाडून मोदी-शहा निवडणुका जिंकत आहेत. लोकशाहीचे सर्व स्तंभ कोसळताना दिसत आहेत. धर्म, जात यांचे राजकारण पराकोटीला गेले. हे सर्व विकार देशाला घातक आहेत. नेपाळपासून बांगलादेशापर्यंत सीमेवरील सर्व राष्ट्रे हुकूमशाहीविरोधात लढत आहेत.
जनता रस्त्यावर उतरते तेव्हा राज्यकर्ते त्यांच्यावर बंदुका, तोफांचा भडीमार करतात. नेपाळात तेच घडत आहे. बांगलादेश, श्रीलंकेतही तेच झाले. नेपाळची आग लोकशाही रक्षणासाठी, भ्रष्ट शासनाच्या विरोधात आहे. काठमांडूचे रस्ते क्रांतिकारक युवकांच्या रक्ताने लाल झाले आहेत, पण त्यामुळे तेथील जनतेचे प्रश्न सुटतील काय? नेपाळात घडत आहे त्यापासून भारतीय जनतेला बरेच काही शिकण्यासारखे असल्याचं सामनाच्या अग्रलेखात लिहिलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.