Operation Sindoor and the Political Reactions : दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी परदेशात गेलेले काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची भारतातही जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषत: आपल्याच पक्षाच्या नेत्यांकडून त्यांना टीकेला सामोरे जावे लागत आहेत. पण त्यावर शांत न बसता अखेर शरूर यांनीही म्यानातून तलवार बाहेर काढत प्रत्युत्तर दिले आहे.
थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अमेरिकेसह पनामामध्ये भारताची ऑपरेशन सिंदूरबाबतची भूमिका मांडली. तसेच पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायाही जगासमोर आणल्या. पनामा सिटीमध्ये बोलत असताना त्यांनी म्हटले होते की, मागील काही वर्षांत दहशतवाद्यांनाही आता कळाले आहे की, त्यांना किंमत चुकवावी लागणार आहे. भारताने सप्टेंबर 2015 मध्ये पहिल्यांदाच एलओसी पार करत सर्जिकल स्ट्राईक केले. असे आधी कधीच घडले नव्हते.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने आंतरराष्ट्रीय सीमाही ओलांडली आणि बालाकोटमधील दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला, असे विधान थरूर यांनी केले होते. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर पलटवार केला. उदित राज म्हणाले, शशी थरूर हे भाजपचे सुपर प्रवक्ते आहेत. भाजप नेत्यांपेक्षा ते मोदींची चमचेगिरी जास्त करत आहेत. आधीच्या सरकारने काय केले हे त्यांना माहिती आहे का? भारतीय सैन्याचे क्रेडिट सरकार घेत आहे. थरूर भाजपच्या पब्लिसिटी स्टंटचे प्रवक्ते बनले आहेत.
काँग्रेस नेते जयराम रमेश आणि पवन खेडा यांनीही थरूर यांच्यावर निशाणा साधला. खेडा यांनी दिवंगत मनमोहन सिंग यांचा एक व्हिडीओ तसेच काही वृत्तपत्रांच्या बातम्या सोशल मीडियात पोस्ट करत यापूर्वीही अनेकदा सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे थरूर यांच्या निदर्शनास आणून दिले. तर जयराम रमेश यांनी थरूर यांची भूमिका पक्षाची भूमिका नसल्याचे स्पष्ट केले.
आपल्याच पक्षातील नेत्यांकडून टीकेचा सामना करावा लागल्यानंतर थरूर यांनीही त्याला कुणाचेही नाव न घेता प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये त्यांनी कट्टरपंथी असा शब्द वापरत पक्षातील नेत्यांना जोरदार टोला लगावला आहे. त्यामुळे थरूर किती दुखावले आहेत, याची प्रचिती येते. तसेच अशा टीकेला प्रत्युत्तर देण्यापेक्षा आपल्याकडे खूप चांगल्या गोष्टी करण्यासारख्या असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
थरूर यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांना पहिल्यांदाच एवढ्या प्रखरपणे टीका केली आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. ते अद्याप भारतात परतले नाहीत. पण त्यानंतरही सोशल मीडियात पोस्ट करत त्यांनी याची दखल घेत आपल्या तीव्र भावना मांडल्या आहेत. थरूर यांनी म्हटले आहे की, माझ्याकडे यासाठी वेळ नाही, पण तरीही भारतीय सैन्याच्या नियंत्रण रेषेपलीकडील शौर्याबद्दल माझ्या कथित अज्ञानाबद्दल बोलणाऱ्या कट्टरपंथींसाठी, अशी सुरूवात करत थरूर यांनी दोन मुद्द्यांमध्ये उत्तर दिले आहे.
मी यापूर्वी स्पष्टपणे फक्त दहशतवादी हल्ल्यांच्या बदल्याबद्दल बोलत होतो. मागील युद्धांबद्दल नाही. माझ्या वक्तव्यामध्ये अलीकडच्या काळात झालेल्या अनेक हल्ल्यांचा संदर्भ होता. या काळात नियंत्रण रेषेवरील आणि आंतरराष्ट्रीय सीमेबाबतच्या आपल्या जबाबदार भूमिकेमुळे आपले प्रत्युत्तर मर्यादित होते, असे मी म्हणालो होतो. पण नेहमीप्रमाणे, माझे विचार आणि शब्द विकृतपणे मांडणारे टीकाकार आणि ट्रोलर्सचे स्वागत आहे. माझ्याकडे खरोखरच खूप चांगल्या गोष्टी करण्यासारख्या आहेत, असे कडक शब्दांमध्ये थरूर यांनी आपली भूमिका मांडली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.