
India vs Pakistan : पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला आहे. पाकिस्तानच्या कुरापतींना प्रत्युत्तर देण्याची जोरदार तयारी भारताने सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी आपापली हवाई हद्द एकमेकांसाठी बंद केली आहे. यामुळे 'एअर इंडिया'ला 60 कोटींहून अधिक डॉलरचा तोटा होण्याची शक्यता आहे. याशिवाय पाकिस्तानवर या हवाई बंदीचा काय परिणाम होऊ शकतो, याचेही चित्र समोर आले आहे.
'इंडिया टुडे'च्या बातमीनुसार, पाकिस्तानमधील विमान कंपन्यांपैकी केवळ 'पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स'चीच विमाने भारताची हवाई हद्द वापरत होती. पूर्व पाकिस्तानमधील ठिकाणांवर जाण्यासाठी प्रामुख्याने चीन व थायलंडच्या विमान कंपन्या भारताची हद्द वापरतात. भारताने हवाई हद्द बंद केल्याचा फटका या विमान कंपन्यांना बसणार नाही.
केवळ आकड्यांचा विचार केल्यास भारतीय विमान कंपन्यांना या घटनांचा आर्थिक फटका बसणार आहे. मात्र, पाकिस्तानच्या कंपन्यांना याचा फटका बसणार नाही, हे विधानही अर्धसत्य आहे. कारण भारतातून पश्चिमेकडे जाणाऱ्या विमानांची व प्रवाशांची संख्या प्रचंड आहे. त्याचवेळी पाकिस्तानमधून त्यांच्या देशाच्या पूर्वेला प्रवास करणाऱ्यांची संख्या तुलनेनं नगण्य आहे.
भारतीय हवाई वाहतूक सध्या जगात तिसऱ्या क्रमांकाची आहे. भारताच्या पुढे केवळ अमेरिका आणि चीन आहे. हवाई वाहतुकीच्या यादीत पाकिस्तान 50 व्या क्रमांकावर आहे. पूर्वेला प्रवास करणाऱ्यांची संख्या, पाकिस्तानची हवाई वाहतूक आणि विमान सेवा यांचे प्रमाणच कमी असल्याने भारताने हवाई हद्द बंद केल्याचा फटकाही भारतीय कंपन्यांच्या तुलनेत फार नसेल.
मूळ संख्याच कमी असल्याने पाकिस्तानी हवाई कंपन्यांचा तोटा आकड्यांमध्ये कमी दिसू शकतो. भारताची हवाई हद्द बंद झाल्यामुळे पाकिस्तानी विमान कंपन्यांना लांबचा मार्ग घ्यावा लागणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ आणि लागणारे इंधन वाढणार आहे. यामुळे आधीपासूनच कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या 'पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स'चा पाय आणखी खोलात जाणार आहे.
दुसऱ्या देशाची हवाई हद्द वापरताना त्या विमान कंपनीला काही फी भरावी लागते. पाकिस्तानी विमाने भारताच्या हद्दीतून न गेल्याने भारताच्या उत्पन्नात फारसा फरक पडणार नाही. पण भारतीय विमाने आता पाकिस्तानची हवाई हद्द वापरणार नसल्याने त्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात 2019 मधील एक उदाहरण बोलके आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने पाच महिन्यांसाठी भारतीय विमानांना हवाई हद्द वापरण्यास बंदी घातली होती. या कालावधीत पाकिस्तानचे 250 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.