NEET controversy : देशभरात नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेलं आंदोलन आणि त्याला मिळत असलेला पाठिंब्यामुळे हा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अशातच मंगळवारी (ता.२२) लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाजवळच ठिय्या आंदोलन केलं.
यावेळी त्यांनी नीट परीक्षेच्या मुद्यावरुन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी राहुल गांधींना पोलिसांना ताब्यात घेतलं. त्यानंतर आता या सर्व परिस्थितीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. प्रधान यांनी एक्सवर पोस्ट करत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
"पावसाळी अधिवेशनादरम्यान गोंधळ निर्माण करण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी विद्यार्थ्यांचा निर्लज्जपणे राजकीय साधन म्हणून वापर करत आहेत. सरकारने नीट प्रकरणावर संसदेत चर्चा करण्याची तयारी दर्शवली तरीही काँग्रेसने चर्चेपेक्षा राजकीय स्टंटबाजीला प्राधान्य दिला", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
धर्मेंद्र प्रधान यांनी कालच्या आंदोलनानंतर जेव्हा राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, 'लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांचा राजकीय हेतूंसाठी वापर करून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
राहुल गांधी आणि काँग्रेसने थेट पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास झाला आणि सुरक्षा नियमांचेही उल्लंघन झाले. सरकारने नीट परीक्षेच्या मुद्द्यावर संसदेत सविस्तर चर्चा करण्याची तयारी दर्शवूनही काँग्रेसने लोकशाही चर्चेपेक्षा राजकीय दिखाव्याला प्राधान्य दिले. विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण हा त्यांचा उद्देश नसून, राजकीय हेडलाईन मिळवण्यासाठी गोंधळ निर्माण करणे हाच त्यामागचा हेतू होता', अशी टीका धर्मेंद्र प्रधान यांनी राहुल यांच्यावर केली.
तर, राहुल गांधींसाठी हा विद्यार्थ्यांचा प्रश्न नसून, चर्चा करण्याचे सर्व मार्ग खुले असतानाही संघर्षाचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. आमचे सरकार नीट संदर्भातील प्रत्येक मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यास आणि देशातील तरुणांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी कटिबद्ध आहे.
देशातील विद्यार्थ्यांना राजकीय मोहिमेतील साधन म्हणून वापरण्यापेक्षा अधिक चांगली वागणूक मिळायला हवी. त्यांना गोंधळाऐवजी निश्चितता, घोषणाबाजीऐवजी उपाय आणि गैरजबाबदारीऐवजी उत्तरदायित्व हवे आहे. आपण आपल्या विद्यार्थ्यांना केवळ संताप नव्हे, तर स्पष्ट उत्तरे, आवश्यक सुधारणा आणि जबाबदारी देणे आवश्यक आहे आणि यासाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे, असंही प्रधान यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हा लढा आता थांबणार नाही - गांधी
दरम्यान, राहुल गांधी यांनी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे फोटो एक्सवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून तुम्ही पूर्ण ताकद लावा पण विद्यार्थ्यांच्या न्यायासाठीचा हा लढा आता थांबणार नाही, असं म्हटलं आहे. तर राहुल यांच्या या ट्विटनंतर रात्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटद्वारेच राहुल यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता काँग्रेसने जी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावर सरकार नेमका काय निर्णय घेणार? याकडे देशातील नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.