

Maharashtra TET update : महाराष्ट्रात शिक्षकपदावर भरतीसाठी घेण्यात येणारी TET परीक्षा पेपरफुटीमुळे काही दिवसांपूर्वीच रद्द करण्यात आली आहे. परीक्षेआधीच पेपरफुटीचे मोठे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. आतापर्यंत पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली असून धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीही आक्रमक झाले आहेत.
राहुल गांधी यांनी सोशल मीडियात पोस्ट करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तीन महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट करत म्हटले आहे की, महाराष्ट्रातील टीईटी पेपरफुटीनंतर परीक्षा रद्द झाली. सहा लाख उमेदवार आता अधांतरी आहे. दोन आठवड्यानंतरही नव्या तारखेबाबत काहीच माहिती नाही.
पेपर फोडणारे मुक्त असून व्यवस्था निर्धास्त आहे. तर ज्यांनी प्रामाणिकपणे कष्ट केले ते शिक्षा भोगत आहेत. देशाचे भविष्य हातात असलेले कार्यरत आणि भावी शिक्षक, त्यांनी वर्षानुवर्षे मेहनत केली, अर्ज भरले, शुल्क दिले, लांब ठिकाणच्या केंद्रांवर पोहोचले आणि आता ते वाट पाहत आहेत. तारीख नाही आणि उत्तरही नाही, अशी टीका राहुल यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांसमोर मांडले तीन मुद्दे
राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर तीन मुद्दे मांडले आहेत. मुख्यमंत्रीजी, दोन गोष्टी आजच... असे म्हणत राहुल यांनी तीन मागण्या केल्या आहेत. टीईटीची नवी तारीख लगेच जाहीर करावी, पेपरफुटीमध्ये जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, उमेदवारांना नव्हे आणि पेपरफुटीमुळे ज्यांचे वर्ष वाया गेले आहे, त्यांना वयाची अटीतून सवलत द्यावी, अशा महत्वाच्या मागण्या राहुल यांनी केल्या आहेत.
चूक संस्थांची आणि शिक्षा उमेदवारांना, हा न्याय नाही, असेही राहुल यांनी म्हटले आहे. येत्या १७ जुलैला डेहराडून येथे राहुल गांधी छात्रों की गूंज या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याठिकाणी पेपरफुटीच्या मुद्द्यावर सविस्तर बोलणार असल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले आहे. आता शिक्षणातील क्रांतीची वेळ आली आहे. अशी व्यवस्था तयार करण्याची वेळ आली आहे, ज्यामध्ये युवकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
फडणवीसांचे प्रत्युत्तर
राहुल गांधींच्या या पोस्टवर फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. मीडियाशी बोलताना त्यांनी म्हटले आहे की, पेपरफोडी करणाऱ्यांना पकडल्यामुळे TET परीक्षा पुढे ढकलावी लागली, हे राहुल गांधींना कदाचित माहिती नसावे. पुढील परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी, यासाठी नियोजन सुरू आहे. राहुल गांधींनी आधी त्यांच्या पक्षाकडे आणि त्यांच्या सरकारांकडे पाहावे, त्यानंतर बोलावे, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.