

नगरपालिका निवडणुकांदरम्यान झालेल्या गोंधळानंतर अखेर निवडणूक आयोग सावध झाल्याचे आढळून आले आहे. आधी झालेल्या चुका लक्षात घेऊन पुढील निवडणुकांसाठी काही बाबी आधीच स्पष्ट करण्यात आल्या आहेत. यामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, सोपी आणि सुटसुटीत होण्याची शक्यता आहे.
सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे अर्ज स्वीकारण्याच्या पद्धतीत करण्यात आला आहे. यावेळी उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. मागील वेळी ऑनलाईन अर्ज स्वीकारताना मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी आल्या होत्या. वेबसाइट बंद पडणे, अर्ज अपलोड न होणे, कागदपत्रे जोडताना अडथळे येणे अशा अनेक तक्रारी उमेदवारांनी केल्या होत्या. त्यामुळे अनेकांचा अर्ज शेवटच्या क्षणी अडकला होता. हा अनुभव लक्षात घेऊन आयोगाने ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसरा महत्त्वाचा बदल प्रचारासंबंधी आहे. महापालिका निवडणुकीत मतदानाच्या 48 तास आधी प्रचार पूर्णपणे बंद करावा लागणार आहे. याआधी मतदानाच्या अगदी आदल्या दिवशीपर्यंत प्रचार करण्यास मुभा होती. मात्र, मुंबई महापालिका अधिनियमातील कलाम 27 (अ) (अ) मध्ये प्रचारासाठी मतदान समाप्ती पूर्वीच्या 48 तासांमध्ये प्रचारासाठी कोणतीही सभा घेता येणार नाही अशी तरतूद आहे. त्यामुळे मुंबईसह सर्व महापालिकांच्या जाहीर प्रचार बंदीचा कालावधी 48 तास इतका राहिल असे आयोगाने जाहीर कले आहे.
तिसरा बदल अर्ज माघारी घेण्याच्या तारखांबाबत आहे. यावेळी 2 जानेवारी 2026 ही एकच अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. नगरपालिका निवडणुकीमध्ये आधी 21 आणि अपिल असल्यास 25 अशा अर्ज माघारी घेण्याच्या वेगवेगळ्या दोन तारखा होत्या. त्यामुळे या वेगवेगळ्या तारखांमुळे उमेदवार आणि पक्षांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. आता एकच तारीख असल्याने प्रक्रिया अधिक स्पष्ट आणि सोपी होणार आहे.
चौथा निर्णय म्हणजे चिन्ह वाटप आणि मतदान दिनांक यामधील कालावधी वाढवण्यात आला आहे. नगरपालिकेमध्ये 26 नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप झाले आणि 1 डिसेंबर रोजी प्रचार संपणार होता. हा कालावधी खूपच कमी होता, त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. आता अधिक कालावधी मिळाल्याने मतदारांपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. चिन्ह वाटप आणि मतदान दिनांक या दरम्यानचा कालावधी वाढवण्यात आला आहे.
पाचवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डमी उमेदवारांबाबतचे नियम. आता डमी उमेदवारांसाठी आधीच 5 सूचक निश्चित करण्यात येणार आहेत. यासाठी राजकीय पक्षांसोबत बैठकाही घेण्यात आल्या आहेत. नगरपालिका निवडणुकीत छाननी दिवशी पत्र काढून 5 सूचक लागतील असे सांगितले होते. त्यामुळे छाननीच्या दिवशी अचानक नियम सांगितले गेले, त्यामुळे वाद निर्माण झाला होता. नव्या बदलांमुळे ही अडचण टळण्याची शक्यता आहे. एकूणच, प्रचंड टीकेनंतर निवडणूक आयोगाने घेतलेले हे निर्णय निवडणूक प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.