

नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत सलग 26 दिवस उपोषण करणारे पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी अखेर केंद्र सरकारच्या लेखी आश्वासनानंतर गुरुवारी रात्री उपोषण मागे घेतले. मात्र, या निर्णयामागे गेल्या काही तासांत घडलेल्या घडामोडींची मोठी साखळी असल्याची माहिती समोर आली आहे.
वांगचुक यांची खालावत चाललेली प्रकृती आणि देशभरात वाढत असलेला विद्यार्थी आक्रोश यामुळे केंद्र सरकारवर दबाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय नेतृत्वाने पडद्यामागे अनेक स्तरांवर चर्चा करून तोडगा काढल्याचे सांगितले जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासोबत जवळपास चार तासांची मॅरेथॉन बैठक घेतली. या बैठकीत सोनम वांगचुक यांनी मांडलेल्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्याचा निर्णय झाला. त्याचबरोबर त्यांच्या प्रकृतीला सर्वोच्च प्राधान्य देत लवकरात लवकर उपोषण सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.
बैठकीनंतर अमित शाह यांच्या आदेशानुसार डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. सरकार आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. वांगचुक यांना उपोषण मागे घेण्यासाठी समजावून सांगण्याची विनंतीही त्यांनी केली.
गुरुवारी रात्री उशिरा जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकारच्या वतीने तयार करण्यात आलेले लेखी आश्वासनपत्र त्यांच्याकडे सुपूर्द केले.
सरकारने परीक्षाव्यवस्थेतील सुधारणांसाठी आणि पेपरफुटी रोखण्यासाठी नवीन विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मांडले जाईल, तसेच त्यास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे या आश्वासनपत्रात नमूद करण्यात आले.
लेखी आश्वासन देताना जे. पी. नड्डा यांनी सांगितले की, जंतर-मंतरवरील शांततापूर्ण आंदोलनात सहभागी विद्यार्थी तसेच 20 जुलै 2026 रोजी संसदेकडे काढण्यात आलेल्या मोर्चातील सहभागी व्यक्तींवर गुन्हे दाखल न करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे.
याशिवाय आंदोलनकर्त्यांच्या इतर मागण्यांवरही सकारात्मक विचार करण्याची तयारी सरकारने दर्शविली. पेपरफुटी आणि परीक्षा सुधारणांबाबत संसदेत सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासनही पुन्हा देण्यात आले.
नड्डा यांनी यावेळी सोनम वांगचुक यांच्या आणखी एका मागणीचा उल्लेख करत NEET पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना योग्य भरपाई देण्याच्या प्रस्तावावरही सरकार सकारात्मक विचार करत असल्याचे सांगितले. या सर्व आश्वासनांनंतर सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांचे उपोषण समाप्त करण्याचा निर्णय घेतला.
उपोषण संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स'वर संदेश देत सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत, लवकर पूर्णपणे बरे व्हावे आणि पूर्वीसारखे निरोगी व्हावे, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचुक यांनी सरकारशी शांततापूर्ण आणि विधायक संवाद सुरू ठेवण्याची भूमिका जाहीर केली. आंदोलनकर्त्यांनी संयम राखावा आणि चर्चेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शांतता राखावी, असे आवाहनही त्यांनी केले. लडाखला परतण्यापूर्वी आंदोलनात सहभागी विद्यार्थी आणि समर्थकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.