
MLA Amol Khatal Patil News : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडून सत्तेवर प्रचंड मताधिक्क्याने महायुतीचं सरकार आलं आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत कधी जिंकल्या नव्हत्या तेवढ्या जागा एकट्या भाजपने जिंकून निर्विवादपणे सर्वात मोठा पक्ष बनण्याची कामगिरी केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीची मात्र अतिशय वाईट अवस्था झाली. विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असणाऱ्या आमदारांची संख्या एकाही पक्षाला गाठता आली नाही. तर अन्य पक्षांचा अक्षरशा सुपडा साफ झालेला दिसला. यामध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नविनिर्माण सेनेचाही समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीत मनसेला(MNS) भोपळाही फोडता आला नाही. उलट त्यांचे एकमेव आमदार राजू पाटील देखील या निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे हा मनसेबरोरच सर्वांसाठीच मोठा धक्का होता. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या निकालावर विरोधी पक्षाने टीका केली आहे, तसेच ईव्हीम गडबडीचाही आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कार्यकर्ता मेळाव्यात टिप्पणी केली.
विधानसभा निवडणुकीच्या निकालावर जे निवडून आलेत त्यांचही विश्वास नाही, असे राज ठाकरे(Raj Thackeray) म्हणाले. तसेच विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सन्नाटा पसरला होता. एवढा सन्नाटा मी कधीच पाहिला नाही. या निकालावर विश्वासच बसत नाही. राजू पाटलांना त्यांच्या गावातील एकही मत पडले नाही, 1400 मतदान असलेल्या राजू पाटलांनी त्यांच्यागावातून एकही मत का पडले नाही, असा सवाल ठाकरे यांनी केला.
तसेच, विशेषत: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांच्या झालेल्या पराभवाचाही यावेळी राज ठाकरेंनी उल्लेख केला. नेहमीच मोठ्या मताधिक्क्याने विजयी होत आलेले थोरात, यंदा अवघ्या दहा हजार मतांनी पराभूत झाले हे शक्य आहे का? असं राज ठाकरेंनी म्हटलं. यानंतर आता विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारऱ्या अमोल खताळ पाटील यांनी राज ठाकरे यांना टोला लगावल्याचे दिसून आले आहे.
आमदार अमोल खताळ यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, ''राजसाहेब, संगमनेरच्या जनतेने पाणीटंचाई, बेरोजगारी, अपूर्ण विकास व जनतेकडे दुर्लक्ष यामुळेच ४० वर्षांपासून निवडून दिलेल्या बाळासाहेब थोरात यांना नाकारलं आहे. ४० वर्षे आमदार, १७ वर्षे मंत्री असून पण तालुक्यात साधी MIDC नाही, शेतीला पाणी नाही. मग जनतेने मत का द्यावी?''
तसेच ''राजसाहेब मुंबईच्या बाहेर या, संगमनेर पाहा, संगमनेरच्या जनतेला परिवर्तन हवे होते, मतांच्या माध्यामतून जनतेन परिवर्तन करून दाखवले. हे सत्य तुम्हाला समजेल! बाकी कोणाच्या तरी सांगण्यावरून पराभवाचे विश्लेषण करण्यापेक्षा बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाची खरी कारणे समजून घेण्यासाठी तुम्हाला मी संगमनेरमध्ये आमंत्रित करतोय.'' असं खताळ यांनी म्हणत टोला लगावला आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.