
Maharashtra News : जनगणनेसह जातीय गणना करण्याचा निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. हा निर्णय घेण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती मोदीजींनी दाखवली त्याबद्दल त्याचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो, अशा शब्दात भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी निर्णयाचे स्वागत केले. यामुळे सबका साथ, सबका विकास अन् सब का विश्वासचे धोरण अधोरेखीत झाल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.
बिहार विधानसभेच्या निवडणुकीआधीच केंद्रातील भाजपा आघाडीच्या सरकारने मास्टर स्ट्रोक लगावला. जनगनणेसोबतच जातीनिहाय गणनेचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील या सरकारच्या या निर्णयाचे सर्वांनीच स्वागत केले. आम्ही ही मागणी किती वर्षापासून करत होतो, त्यासाठी कसा पाठपुरावा केला हे सांगायला देखील नेते विसरले नाहीत.
काँग्रेसचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान भाजपाचे राज्यसभेतील खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीही मोदींच्या निर्णयाचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जनगणनेसोबत जातीय गणना करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. या निर्णयामुळे भारतात तब्बल 94-95 वर्षानंतर जातीय गणना होणार आहे.
यापूर्वीची जातीय जनगणना 1931 मध्ये झाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच मोदी सरकारने याविषयी ठोस भूमिका घेतली आणि राजकीय विषयांवरील केंद्रीय मंत्र्यांच्या समितीत जातीय गणनेच्या निर्णयाला मंजुरी दिली. या निर्णयामुळे नरेंद्रजी मोदी यांचे 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास'चे धोरण अधोरेखीत झाले आहे. हा निर्णय सामाजिक न्यायाप्रती मोदी सरकारची कटीबद्धता दर्शवणारा निर्णय आहे.
जातीय गणनेतून सर्वच समाजांची अचूक लोकसंख्या आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीचा डेटा उपलब्ध होईल. यातून सर्वसमावेशक विकास साधता येईल. वंचित घटकांसाठी असलेल्या योजनांची अधिक सुयोग्य अंमलबजावणी करणे शक्य होऊ शकेल. जातीय जनगणनेची मागणी यापूर्वी अनेकदा झाली आहे. मी सुद्धा मागील अनेक वर्षांपासून अनेक व्यासपिठांवर या मागणीचा सातत्याने पुरस्कार केला आहे.
हा निर्णय घेण्याची राजकीय इच्छाशक्ती दाखवल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करतो, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाचे जनतेतून जोरदार स्वागत होते आहे. या निर्णयाबद्दल मोदी सरकारचे आभार मानण्यासाठी भाजपच्या नांदेड ग्रामीण उत्तर जिल्ह्यांतर्गत भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर व मुदखेड येथे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज जल्लोश केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.