
Bachchu Kadu News : माजी आमदार बच्चू कडू हे गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी,यासाठी आमरण उपोषण सुरू केलं होतं. सर्वच नेत्यांकडून त्यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत होता. मात्र,त्यांनी सातव्या दिवशी आंदोलन मागे घेतलं. आता ते मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
माजी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) हे आता ते येत्या पाच जुलैपासून डॉ. पंजाबराव देशमुख यांचं जन्मगाव असलेल्या पापळपासून देशातील पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या चिलगव्हाणपर्यंत (जि.यवतमाळ) पदयात्रा काढणार असल्याची घोषणा काढणार आहेत. पण त्याआधीच माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधानसभेतील जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर गमावलेली आमदारकी पुन्हा मिळवण्याबाबत मोठे संकेत दिले आहेत.
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी 'सरकारनामा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत महाराष्ट्राच्या राजकारणासह आमरण उपोषण, आगामी 138 किलोमीटरची पदयात्रा,शेतकऱ्यांची कर्जमाफी,दिव्यांगांचे समस्या यांसह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांनी यावेळी महायुती (Mahayuti) सरकारच्या धोरणांवरही टीका करताना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीवरही भूमिका स्पष्ट केली.
विधानसभेचा पराभव विसरुन प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी आता पुन्हा एकदा राजकारण तापवण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी शेतकर्यांसाठी सुरु केलेला लढा हा अधिक टोकदार करण्यासाठी पावले उचलली आहेत. ते आमरण उपोषणानंतर आता पदयात्रा काढणार आहेत. पण त्याचवेळी त्यांनी आमदारकीची इच्छाही बोलून दाखवली.
कडू म्हणाले, आपण जे आंदोलन, पदयात्रा काढत आहोत, त्याच्यातून राजकीय फायदा होईलच ना,आणि झाला नाही पाहिजे का. कारण मीही एक राजकारणीच आहे ना. त्यामुळे याच्यातून काही ना काही फायदा हा होणार आहे. माझ्या फायद्यापेक्षा लोकांचा किती फायदा होतो, आणि त्यांच्या फायद्यातून जर माझा फायदा होत असेल,तर त्यात वाईट काय आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
महायुतीकडून कुठलीही ऑफर देण्यात आली, तरी आपण त्याचा विचार करणार नाही. आजपर्यंत आपण तसे कधीच केले नाही. मला आमदार व्हायचं असतं ना, तर मी 20 वर्षे आमदार राहिलो. पाच निवडणुका लढवल्या. पण मी कुठल्याही पक्षाचा पाठिंबा घेतला नाही.आर आर पाटील पण मला राष्ट्रवादीत ये, पक्षाच्या तिकीटावर उभा राहा, तुला मंत्रिपद देतो, असं म्हणाले होते. पण मी नाही राहिलो, असेही कडू यांनी या मुलाखतीत म्हटलं.
मला कोणत्याही राजकीय पक्षांचा गुलाम व्हायचं नाही.जनतेचा गुलाम राहू. राजकीय पक्षांचा गुलाम राहायचं बच्चू कडूच्या रक्तात नाही, आणि मरेपर्यंतही राहणार नाही. त्यांना आताही मला विधान परिषद देता आली असती, मलाही घेता आली असती, असा प्रस्तावही होता. पण मी तो नाकारला, असा गौप्यस्फोटही माजी आमदार बच्चू कडू यांनी यावेळी केला.
आपण आता शिक्षक पदवीधरची निवडणूक लढवणार असल्याचेही संकेतही प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी दिले. ते म्हणाले,शिक्षक पदवीधरची निवडणूक लढवण्यासाठी सध्या चाचपणी सुरु आहे. वीस हजार की तीस हजार मतं आहेत, त्या 20 हजार शिक्षकांशी बोलणार आहे.ते हो म्हणाले तर लढणार आहोत,असंही बच्चू कडू यांनी सांगितलं. त्यामुळे कडू हे आता शिक्षक पदवीधर मतदारसंघातून आमदारकी लढवणार असल्याचे एकप्रकारे संकेतच दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.