प्रकाश लिमये
Eknath Shinde News : मिरा-भाईंदर शहरातील विविध विकासकामांवर लावण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या छायाचित्र असलेल्या फलकांना भाजपाने आक्षेप घेतला आहे, अशी छायाचित्रे लावणे राजाशिष्टाचाराचे उल्लंघन असल्याने ही छायाचित्रे काढून टाकावी अशी मागणी भाजपने केली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील भाजप व शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
प्रताप सरनाईक यांच्या मागणीवरून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरा भाईंदरमधील विविध विकास कामांसाठी सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यापैकी काही कामांचे भूमिपूजन अथवा उदघाटन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या विकासकामांच्या ठिकाणी ठळकपणे दिसतील अशी एकनाथ शिंदे व प्रताप सरनाईक यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. आता या बॅनरवर भाजपने आक्षेप घेतला आहे.
विकास कामांच्या ठिकाणी नेत्यांची बॅनर लावणे राजाशिष्टाचाराच्या विरोधात आहे त्यामुळे ही ते काढून टाकावे अशी मागणी भाजपाने केली आहे. गुरुवारी (ता. १३) झालेल्या महासभेत त्यावर जोरदार चर्चा रंगली. भाजपच्या या मागणीला शिवसेनाच्या नगरसेवकांकडून विरोध करण्यात आला. परंतू संख्याबळाच्या जोरावर सत्ताधारी भाजपने आपला प्रस्ताव सभागृहात मंजूर करवून घेतला.
काही दिवसांपूर्वी भाईंदर पश्चिम येथील क्रीडासंकुलाच्या उदघाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेत राजाशिष्टाचाराचे उल्लंघन झाल्याचा आरोप करून प्रताप सरनाईक यांनी भाजपाला लक्ष्य केले होते. त्याला भाजपने या मागणीद्वारे उत्तर दिले असल्याचे मानले जाते. मात्र यामुळे स्थानिक पातळीवरील दोघांमधील संघर्ष आणखी तीव्र झाला असल्याचे यावरून दिसून येत आहे.
ग्रामपंचायत पासून ते महापालिकेपर्यंत अनेक विकास कामांची उदघाटने झाली. मात्र त्यावेळी कोणीही आपल्या नेत्यांची छायाचित्रे त्यावर लावली नाहीत. त्यामुे शिवसेनेने नेत्यांची छायाचित्रे लावणे योग्य नसून ते राजाशिष्टाचारात बसत नाही. म्हणून ही छायाचित्रे काढण्याची मागणी भाजपाने केली आहे अशी प्रतिक्रिया उपमहापौर ध्रुव किशोर पाटील यांनी दिली.