
Pune News : पावसाळी अधिवेशनानंतर महाराष्ट्रातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. एकीकडे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे.तसेच सरकारमधील वादग्रस्त 8 मंत्र्यांना लवकरच डच्चू मिळण्याची शक्यता असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) मंत्रिमंडळातील कमबॅकवर मोठं विधान केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी(ता.25) पुण्यात मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील पुन्हा एन्ट्रीवर थेट भाष्य केलं. ते म्हणाले, धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं, त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्यावर न्यायालयानं काय सांगितलं? त्यांना त्या प्रकरणात क्लिनचिट देण्यात आल्याचं अजित पवारांनी म्हटलं.
तसेच कृषी विभागातील त्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठेही दोष नाहीये, आता अजून त्यांच्या संदर्भातील एक गोष्ट आहे, त्यावर देखील पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं कारवाई करत आहे, या प्रकरणात जर त्यांना क्लिनचिट मिळाली तर आम्ही त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी देऊ, असं विधान अजित पवार यांनी केल्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
अजित पवारांनी (Ajit Pawar) जर वाल्मिक कराड प्रकरणातून धनंजय मुंडेंना क्लिन चीट मिळाल्यानंतर आणि त्या प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचं सिद्ध झालं,तर आम्ही त्यांना पुन्हा मंत्रिपद देऊ, असं वक्तव्य अजितदादांनी पुण्यात केलं आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवर यांच्यासह धनंजय मुंडेंवरही गंभीर आरोप करण्यात आले होते. हे सगळं सुरू असताना भाजप आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडेंच्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
त्यानंतर आता धनंजय मुंडे हे पुन्हा मंत्रिपदावर येणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच यावर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, ‘धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं का? हा निर्णय मुख्यमंत्री आणि अजितदादा यांनी घ्यावा. धनंजय मुंडे यांना सगळी क्लिन चीट मिळाली का? जे आरोप होते ते वेगळे होते, त्याविषयी मी बोललो होतो. धनंजय मुंडे यांच्यावर जे गंडांतर आले, त्यावर निकाल लागला तर हे निश्चित होणार आहे. हा वाद मिटलाच पाहिजे, असंही भुजबळ यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील गंभीर आरोप आणि कृषी खात्यातील घोटाळ्यांप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली होती.
देशमुख हत्याप्रकरणाचे धक्कादायक फोटो बाहेर आल्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. तत्पूर्वी देवगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांच्यात महत्त्वाची बैठक झाली होती, अशीही माहिती त्यावेळी समोर आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.