
Shiv Sena political campaign : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून महायुतीत रमेनासे झाल्याचे दिसते. महायुतीत राहून शिवसेनेची भविष्यात कितपत ताकद वाढेल, याचा अंदाज त्यांना एव्हाना आल्याचे दिसते. त्यामुळे त्यांनी आपली शिवसेना घेऊन, ते स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वेगळी बांधणी करत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमधून स्थानिक पातळीवर ताकद वाढली, तर संघटन मजबूत होईल, हेरुन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं पुढील आठवड्यापासून राज्यात संपर्क अभियान राबवणार आहे. एकनाथ शिंदे यांचं हे संपर्क अभियान म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा चाचपणी असून, महायुतीमधील मित्रपक्षांना 'कात्रजचा घाट' दाखवण्याच्या तयारी असल्याची चर्चा आहे.
महायुती (Mahayuti) सरकार स्थापन झाल्यानंतर भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच सक्रिय झाले आहे. राज्य सरकारच्या 46 खात्यांना 100 दिवसांचं कृती अभियान दिलं. वेगवान निर्णय घेताना, एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री काळात घेतलेल्या काही निर्णयांना ब्रेक दिला, तर काही निर्णयांमध्ये फेरबदल केले. रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा देखील तसाच आहे. एकनाथ शिंदे निर्णय प्रक्रियेत असून देखील ते दिसत नाहीत. एकप्रकारे ते झाकून गेल्याचे दिसते.
अमित शाह यांचा आजचा रायगड दौरा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) झुकते माप देणारा ठरला. रायगडावरील कार्यक्रमात दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाषणाला संधी नव्हती. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजीनाट्य टाळण्यासाठी एकनाथ शिंदेंना ऐनवेळी भाषणाला उभं केलं. एकप्रकारे एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना महायुतीत बाजूलाच कुठेतरी आहे, असेच काहीसे चित्र यावेळी होते.
महायुतीत रोज राजकीय घडामोडी घडत आहेत. एकमेकांवर कुरघोड्या केल्या जात आहे. फाईली आडवल्या जात आहेत. यातून मित्रपक्षांना डिवचून दुखवण्याचे प्रकार होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाला समोरे जाताना, कार्यकर्ते, पदाधिकारी संभाळताना, हे अधिकच प्रकार वाढणार आहेत, हे लक्षात घेऊन एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, महापालिका निवडणुकीत वेगळीच भूमिका घेण्याचे संकेत मिळाले आहेत.
पुढील आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्क अभियान राबवण्याचा निर्णय मुंबईतील बैठकीत झाला आहे. कल्याण पश्चिमेतील 38 प्रभागांमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली.
या अभियानाअंतर्गत दर दिवशी एक वॉर्ड, अशा पद्धतीने कार्यकर्ते आणि तेथील नागरिक यांना एकत्रपणे भेटण्याचा कार्यक्रम आहे. जेणेकरून कार्यकर्त्यांना त्यांचे मनोगत, अडीअडचणी, पक्षवाढीसाठी संवाद साधता येईल. अशाचपद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचे संपर्क अभियान सुरू राहणार असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांचे म्हणणे आहे. यासाठी शिवसेनेचे संपर्क अभियान यशस्वी होण्यासाठी नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेळोवेळी संबंधित नेत्यांवर जबाबदारी निश्चित करणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं हे संपर्क अभियान म्हणजे, महायुतीमधील मित्रपक्षांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 'कात्रजचा घाट' दाखवणारे ठरू शकते, असं सांगितलं जात आहे. एकप्रकारे, महायुतीमधील मित्रपक्षांना बाजूला सारत एकनाथ शिंदे आपल्या शिवसेना कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना अधिक बळ देणार, अशी चर्चा आहे. परंतु शिंदे यांच्या या रणनीतीला भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी कितपत यशस्वी होऊ देणार की, कुरघोड्यांचं राजकारणातून 'स्थानिक'च्या निवडणुकांमध्ये महायुती तुटणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.