Mumbai News : लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून 3 मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास पाच दिवसाचा कालावधी शिल्लक असताना महायुतीच्या पाच जागांचा तिढा सुटत नसल्याने डोकेदुखी वाढली आहे. या जागेवरुन महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या एक जागेवरील उमेदवार ठरत नसल्याने अडचणीत वाढ झाली आहे.
महायुतीमधील ठाणे, पालघर, दक्षिण मुंबई, मुंबई उत्तर-पश्चिम आणि नाशिक या पाच जागांचे वाटप झाले नसल्याने उमेदवार ठरत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ठाण्याची जागा शिंदे सेनेला जाणार की भाजपला याचा निर्णय झाला नाही. तर दुसरीकडे कल्याण मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची उमेदवारी निश्चित झाली असली तरी शेजारील ठाणे मतदारसंघाचा तिढा सुटत नसल्याने कल्याणची घोषणा रखडली आहे. ठाणे मतदारसंघावर भाजप व शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे. याठिकाणी प्रताप सरनाईक (Pratap sarnaik) व नरेंद्र म्हस्के इच्छूक आहेत.
सर्वाधिक रस्सीखेच नाशिकमध्ये पाहावयास मिळत आहे. या ठिकाणी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यासाठी शिवसेना शिंदे गट आग्रही आहे तर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघावर दावा सांगत असल्याने जागावाटपात हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार यावरून उत्सुकता ताणली गेली आहे.
पालघर मतदारसंघात विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्यासाठी शिंदे सेना आग्रही आहे तर दुसरीकडे भाजपकडून ही जागा उमेदवारासह मागितली जात असल्याने या जागेबाबत काय निर्णय घेतला जाणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
दक्षिण मुंबईसाठी शिंदे सेना व भाजपकडून दावा केला जात आहे. शिंदे गटाकडून या ठिकाणी यामिनी जाधव तर भाजपकडून राहुल नार्वेकर व मंगलप्रभात लोढा यांचे नाव चर्चेत आहे. तर दुसरीकडे मुंबईतील या मतदारसंघात शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये चुरस आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार याची उत्सुकता ताणली गेली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार अद्याप उमेदवार ठरलेला नाही. या ठिकाणावरून शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी लढण्यास नकार दर्शविल्याने रवींद्र वायकर व संजय निरुपम यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
मुंबई उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार ठरत नाही. त्यामुळे येत्या काळात लवकरच शोध घेऊन काँग्रेसला या ठिकाणाहून उमेदवाराची घोषणा करावी लागणार आहे, सर्वांचे लक्ष या घोषणेकडे लागले आहे.