
Beed News, 05 Jan : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करून ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी राज्यातील ग्रामपंचायतीत 9 जानेवारीला काम बंद आंदोलन केलं जाणार आहे.
याबाबतची माहिती पंचायत राज मंच संचालित अखिल भारतीय सरपंच परिषदेने दिली आहे. सरपंच देशमुख यांच्या हत्येमुळे बीडसह राज्यभरातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीचं कामकाज दबावाखाली करावं लागतं.
त्यामुळे निर्भीड आणि स्वतंत्रपणे काम करण्यसाठी सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करावा अशा विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायतीत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने 9 जानेवारीला सरपंच संतोष देशमुख यांना राज्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.
काम बंद आंदोलन सरपंच परिषदेचे संस्थापक व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व राज्य सरचिटणीस विवेक ठाकरे, वरिष्ठ उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांनी जाहीर केले आहे. तसंच याबाबतचा निर्णय शासनाला कळवण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना याबाबत मागणी निवेदन देण्यात आलं आहे.
तर राज्यातील सर्वच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांना गावकारभारी असणाऱ्या सहकाऱ्यांना संरक्षण असणे अत्यंत गरजेचे आहे. सरपंच हा पब्लिक सर्व्हन्ट असल्याबाबत तेलंगणा व राजस्थान उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाचाही निर्णय आहे.
त्यानुसार सरपंचाच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पूर्वीचे भादवी 353, आताचे भारत न्यायसंहिता 132 प्रमाणे गुन्हा नोंद व्हावा, तरच गावच्या विकासकामात अडथळा आणणाऱ्यावर जरब बसेल. तसंच सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण अत्यावश्यक असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.
- सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी संरक्षण कायदा असावा.
- प्रत्येक ग्रामसभेला पोलिस संरक्षण अनिवार्य.
- सरपंत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि देशमुख कुटुंबियातील एकाला शासकीय नोकरी द्यावी.
- संतोष देशमुख यांचे स्मारक त्यांच्या गावात उभारावे.
- सरपंचांना विमा संरक्षण व पेन्शन लागू करावी.
- ग्रामसभा सर्व ग्रामस्थांसाठी असल्याने ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगमध्ये इतरांना कायद्याने प्रतिबंध असावा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.