
उद्या, परवा आणि तेरवा अशा सलग तीन दिवसांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. अनेक विद्यार्थ्यांचे ट्रेन , एसटी बसमधून फोन येत आहेत की, ते रस्त्यातच अडकले आहेत. ते उद्या परीक्षा केंद्रावरही पोहचू शकत नाहीत. जर ते परीक्षा केंद्रावर पोहचू शकले नाहीत तर त्यांची मागील कित्येक वर्षांची तयारी अशीच वाया जाईल. या नैसर्गिक आपत्तीचा विचार करता, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्वरीत निर्णय घेऊन आगामी तीन दिवसांत होऊ घातलेल्या या परीक्षा स्थगित करून पुढे योग्य त्या दिवसांत या परीक्षा घ्याव्यात, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी ही मागणी करीत आहेत. असं आव्हाडांनी म्हटलं आहे.
आज महाराष्ट्रात प्रशासनाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. मे महिन्यातच, मुंबई पावसामुळे कोलमडली आहे. गेल्या आठवड्यात अंधेरी सबवे आणि साकीनाका पाण्याखाली गेले होते.आज दक्षिण आणि मध्य मुंबईला भाजप आणि भ्रष्ट मिंधे नियंत्रित BMCच्या कारभाराचा फटका बसला आहे. हिंदमाता आणि गांधी मार्केट हे नेहमीच पावसाळ्यात जलमय होणारे भाग आमच्या सरकारने २०२२ मध्ये पूरमुक्त केले होते. आज पुन्हा ते भाग जलमय झाले, ह्याचे एकमेव कारण म्हणजे ढिम्म प्रशासन! असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आणि भ्रष्टाचार तरंगायला लागला. मुंबई महापालिकेत झालेला भ्रष्टाचार सर्वांच्या समोर आहे. मुंबई पालिकेवर प्रशासक आले, त्यावेळी मुंबई महापालिकेच्या ठेवी तब्बल ९० हजार कोटी रुपयांच्या होत्या, त्या फस्त करून अनुदानही लाटण्यात आले. नव्याने १६०० कोटी रुपये कर्ज काढले. हा सर्व पैसा सरकारने लाटला आहे. त्याचा परिणाम आज मुंबई तुंबल्याचे दिसून येत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
मुसळधार पावसामुळे राज्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उद्यापासून दोन दिवस होणाऱ्या पक्षाच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रस्त्यावर उतरून नागरिकांना मदत करण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते नागपुरात राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ (एनएफएसयू) कॅम्पसचे भूमिपूजन करण्यात आले आहे. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या तयारीचा आणि पक्षसंघटनेचा आढावा घेतला. तेथून ते नाशिकवरून पुण्याला जाणार होते. मात्र, नाशिकचा दौरा अर्धवट सोडून राज ठाकरे आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेला आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ही पोलखोल कशी काय? पाऊस जर 15 दिवस आधी पडला तर काय होणार, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. मी कंट्रोल रूममधून सगळे स्पॉट पाहिले, आता पाणी राहिलेले नाही, यंत्रणा अलर्ट आहे असेही एकनाथ शिंदेंनी म्हटलं. दरम्यान, माहिम भागात म्हाडा इमारतीचा काही भाग कोसळला आहे. आधीच पाऊस पडल्यामुळे थोडी गैरसोय झाली आहे, अशी माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुंबईसह राज्यभरात मान्सूनने धमाकेदार एन्ट्री केली आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसात मुंबईकरांची दैना केली असून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईमध्ये अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे अनेक भागांमध्ये नालेसफाई, रस्त्यांची कामे रखडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्यानंतर आता विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 'महाभ्रष्ट महायुतीने मुंबई डुबवली, अशी टीका आदित्य ठाकरेंची यांनी राज्य सरकारच्या कारभारावर केली.
मुंबईत मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये आज सकाळपासून तुफान पाऊस पडत असून अनेक रस्ते, रेल्वेमार्ग पाण्याखाली गेले आहेत. मुंबई मागील १०० वर्षांतील मे महिन्यांतील रेकॉर्डब्रेक पाऊस झाल्याचे सांगितले जात आहे. कोकणातही मुसळधार सुरू असून रायगड आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई येथे सुरु असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी लोकल सेवा ठप्प झाली आहे. पनवेल ते मुंबई हर्बल सेवा दहा ते पंधरा मिनिटे लेट आहेत. मुसळधार पावसामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. प्रवासांना 15 ते 20 मिनिटे रेल्वेची वाट पाहावी लागत आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकीत कुठल्या पक्षाशी युती अथवा स्वतंत्र लढले जाणार याची रणनीती ठरवण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आज पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले गृह राज्य असलेल्या गुजरातच्या दोन दिवस दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी गर्दी जमली आहे. नागरिक हातात तिंरगा घेऊन त्यांच स्वागत करीत आहेत. 82,000 हजार कोटी रुपयाच्या विकास योजनांचे उद्धघाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज येणार आहेत. दुपारी बारा ते एक च्या दरम्यान आम्ही शहा यांचे नांदेड मध्ये आगमन होईल.नांदेड शहरातील नवीन मोंढा मैदानावर अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा होणार आहे. मात्र, पावसाचे शक्यता लक्ष्यात घेत सभेच्या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आलेला आहे
मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिला आहे. ते 29 ऑगस्टला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करणार आहेत. सरकारला ही शेवटची संधी असल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.
गृहमंत्री अमित शाह नागपूरमध्ये झाले आहेत. अमित शहांचे स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. शहा हे आज नांदेडमध्ये सभा घेणार आहेत.
रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे बारामतीतील नीरा डावा कालवा फुटला. कालव्याचे पाणी रस्त्यावर, शेतात आले. बारामतीतील दीडशेहून अधिक लोकांच्या घरात पाणी शिरल्याची घटना घडली आहे. तीन इमारतींना तडे गेले आहेत. पावसाने झालेल्या नुकसानाची पाहाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भले पहाटे केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.