
महाराष्ट्रातील अतिवृष्टीने शेतकर्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी बळीराजा शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसला आहे. हेक्टरी किमान 50 हजार रुपयांची मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. राज्य सरकारने आतापर्यंत जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंत झालेल्या नुकसानीची भरपाई दिली आहे. मात्र ही मदतही अत्यंत तोकडी असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. आता सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या मदतीसाठी सरकारकडे विनंती केली जात आहे.
ही मदत कधी येईल याची कल्पना नाही. पण या स्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. देशमुख यांनी मुख्यमंत्री असताना एकदा शेतकऱ्यांना थेट अमेरिकेतून एका फोनवर मदत जाहीर केली होती. तर एकदा दूध दराचे आंदोलन अमेरिकेतून मिटवले होते. शेतकऱ्यांचे प्रश्न एवढ्या जिव्हाळ्याने हाताळणारा आणि तातडीने मार्गी लावणारा नेत म्हणून आजही विलासराव देशमुख यांची आठवण काढलीच जाते.
माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विलासराव देशमुख यांचा हा किस्सा सांगितला आहे. 2006-07 या वर्षांतील गोष्ट. त्यावेळी विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात बाळासाहेब थोरात मंत्री होते. चंद्रपूरला अचानक सोयाबीनवरती आळी पडली होती. त्यामुळे पीक वाया जाण्याची भीती होती. या भीतीपोटी शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन सुरु केले. विलासराव देशमुख त्यावेळी अमेरिकेमध्ये होते. या आंदोलनाची बातमी कळताच त्यांनी बाळासाहेब थोरात यांना फोन करून तातडीने चंद्रपूरला जायला लावले.
थोरात यांनी विदर्भात जाऊन झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यांनी तिथूनच विलासराव देशमुख यांना फोन केला. त्यांनी सांगितलं "आळी आलीय हे खरं आहे. यासाठी शेतकरी 4 हजार रुपये तरी हेक्टरी मदत मागत आहेत." विलासरावांनी तातडीने "मदत दिली म्हणून सांगून टाका" असं सांगण्यास सांगितलं. या तातडीच्या होकाराने बाळासाहेबही काहीसे चपापले. "एवढ्या लगेच मदत द्यायची, कॅबिनेटची संमती नाही, असं कसं?" सा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
त्यावर विलासराव पुन्हा म्हणाले, "बाळासाहेब, मी मुख्यमंत्री आहे. सांगून टाका लोकांना 4 हजार रुपये हेक्टरी दिले म्हणून." बाळासाहेब थोरात यांना या निर्णयाचे आजही आश्चर्य वाटते. 4 हजार रुपये शेतकरी मागतोय आणि देऊन टाका म्हणायचे हे धाडस सोपे नव्हते. 200-500 कोटी रुपयांचा विषय होता. पण माझ्या शेतकऱ्याकरिता माझी काहीही करण्याची तयारी आहे ही भावना विलासराव देशमुख यांच्या त्या निर्णयामध्ये होती, असे बाळासाहेब थोरात आजही सांगतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.