

India Political Crisis : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला झालेल्या मोठ्या निवडणूक पराभवानंतर देशातील राजकारणात नवे समीकरण तयार होण्याच्या चर्चांना वेग आला आहे. सेक्युलर विचारधारेचे विविध पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याच्या शक्यतेवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांना पक्षाच्या हायकमांडकडून तातडीने दिल्लीत बोलावण्यात आल्याने राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
दिल्लीत रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP SP) पक्षाच्या इतर सेक्युलर पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणावर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत मतविभाजन रोखण्यासाठी आणि लोकशाही व संविधानाचे संरक्षण करण्यासाठी सर्व समान विचारधारेच्या पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
देशात सध्या ज्या पद्धतीने राजकीय घडामोडी सुरू आहेत, संविधानिक व्यवस्था कमजोर करण्याचे प्रयत्न होत आहेत, अशा परिस्थितीत देशहितासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी सेक्युलर विचारांचे सर्व पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे पटोले (Nana Patole) यांनी नमूद केले.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालानंतर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमधील संबंधांबाबतही विविध राजकीय चर्चा रंगल्या आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा प्रस्ताव दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या घडामोडींवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही मोठे विधान करत काँग्रेसमधून फुटलेल्या सर्व घटकांनी पुन्हा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे, असा सल्ला दिला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र या वक्तव्यावर सावध भूमिका घेत, ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. देशहितासाठी काँग्रेस लढत असून अंतिम निर्णय पक्ष हायकमांडच घेईल, असे स्पष्ट केले.
तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही राऊत यांच्या विधानावर संयमित प्रतिक्रिया देत, संजय राऊत यांचे मत परखड असते. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही त्यांच्या सूचनांची नोंद घेतो, असे म्हटले. सुळे यांच्या या सावध प्रतिक्रियेमुळे विलिनीकरणाच्या चर्चांना अधिकच बळ मिळाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
दरम्यान, देशातील विविध आघाड्यांमध्ये पुन्हा एकत्रीकरणाच्या चर्चांनी वेग घेतल्याने महाराष्ट्रासह राष्ट्रीय राजकारणात मोठ्या उलथापालथींचे संकेत मिळत आहेत. पुढील काही दिवसांत या घडामोडींना निर्णायक वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.