Jayant Patil : "बच्चू कडूंबाबत मला विश्वास..."; पुण्यात तिसऱ्या आघाडीची बैठक सुरु असतानाच जयंत पाटलांनी टाकला डाव
Jayant Patil On Bachchu Kadu : आगामी विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या आघाडीसाठी स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) शेतकरी नेते राजू शेट्टी आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू हे प्रमुख भूमिकेत आहेत.
याच आघाडीच्या संदर्भात आज आज (ता.19 सप्टेंबर) पुण्यात एक महत्वपूर्ण बैठक पार पडत आहे. या बैठकीत तिसऱ्या आघाडीचं नाव काय असावं? आघाडी कशी असेल यावर चर्चा होणार आहे.
मात्र, ही बैठक पार पडत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी थेट बच्चू कडूंना महाविकास आघाडीत येण्याचं आवाहन केलं आहे. पाटील यांच्या या आवाहनामुळे आता बच्चू कडू काय निर्णय घेणार? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
जयंत पाटील यांना पुण्यातील तिसऱ्या आघाडीच्या बैठकी संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावं, अशी आमची इच्छा आहे. आम्ही भाजप (BJP), शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याविरोधात एक आघाडी तयार केली आहे. पण आमच्या मतांमध्ये विभागणी करण्यासाठी महाराष्ट्रात काही लोक उभे राहत आहेत, त्यांना भाजपचा पाठिंबा आहे. त्यामुळे अशा कोणत्याही प्रकाराला बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी बळी पडणार नाहीत असा मला विश्वास आहे."
बच्चू कडू आमच्याबरोबर येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू. भाजपला अप्रत्यक्ष मदत होणार नाही, याची काळजी ते घेतील, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचंही पाटील यावेळी म्हणाले. पाटील यांच्या या वक्तव्यावर तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महाविकास आघाडी महायुती दोघेही अपयशी
दरम्यान, पुण्यातील तिसऱ्या आघाडीच्या बैठकीपूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना राजू शेट्टी यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर टीकी केली. राजू शेट्टी म्हणाले, "जसजशा आमच्या बैठका होतील तसं तिसऱ्या आघाडीला एक व्यापक स्वरूप मिळेल. प्रत्येक मतदारसंघात एक आश्वासक चेहरा निश्चित करून आमच्या सर्व जणांची ताकद त्यांच्या मागे उभी करण्याचं आमचं नियोजन आहे.
गेल्या पाच वर्षात अडीच वर्ष आम्ही महाविकास आघाडी आणि अडीच वर्षे महायुतीचे सरकार पाहिलं. मात्र ही दोन्ही सरकार अपयशी ठरली आहेत. राज्यात महिला असुरक्षित आहेत. तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. कामगारांचे प्रश्न आहेत. हे प्रश्न सत्ताधाऱ्यांना सोडवले नाहीत. महाराष्ट्रातील महत्त्वाचे जे प्रमुख आहेत ते दोन आघाड्यांमध्ये विभागले आहेत. या प्रस्थापितांना शह देण्यासाठी तिसरी आघाडी घेऊन येत आहोत. कारण महाराष्ट्राचा सातबारा कोणाच्या बापाचा नाही. तो सामान्य जनतेचा आहे."
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.