
Mumbai News : गेल्या आठ ते दहा दिवसातील घटनाक्रम पहिला तर राज्यातील वातावरण तापलेले पाहवयास मिळाले. 18 जुलैला विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडले. त्यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे गेल्या दहा ते बारा दिवसापासून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. त्यातच लातूरमध्ये 20 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे अध्यक्ष नीलेश चव्हाण यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. त्यामुळे कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले होते.
दुसरीकडे कोकाटे यांच्यावर मुख्यमंत्री फडणवीस देखील नाराज असल्याने अजितदादावरील दबाव वाढला होता. त्याचमुळे गेल्या दोन दिवसापासून पडद्याआड अनेक हालचाली झालेल्या पहावयास मिळाल्या त्यानंतर आता कोकाटे यांचे खाते बदल करण्यात आले आहे.
कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले होते तर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी अजितदादांची (Ajit Pawar) भेट घेतली होती. त्यावेळी अजितदादांनी 29 जुलैपर्यंत निर्णय घेऊ असे सांगितले होते. त्यामुळे गेल्या चार दिवसापासून राज्यातील हालचालींना वेग आला होता. मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीला कोकाटे हजर होते. त्यापूर्वी अजितदादांची भेट घेऊन त्यांनी चुकीची कबुली दिली होती. त्यांनतर यावेळी सीएम फडणवीस यांनी कॅबिनेटमध्ये मंत्र्यांची कानउघाडणी करताना वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या विषयावर पडदा पडला होता.
त्यातच बुधवारी पडद्याआड सुरुवातीला कृषी मंत्रालय मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री मकरंद पाटील यांना दिले जाण्याची तयारी सुरु होती. मात्र, मकरंद आबांनी कृषी मंत्रीपद घेण्यास नकार दर्शवला होता. यावेळी त्यांनी सांगितले की, मदत‑पुनर्वसन खाते मी आता पूर्णपणे समजून घेतले आहे, आता हेच खाते माझ्याकडे ठेवा, असे अजितदादाना सांगितले होते. त्यामुळे मकरंदआबांचे नाव मागे पडले होते.
त्यानंतर अजितदादांनी नाराज असलेल्या दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्याकडे कृषी मंत्रीपद देण्याचा निर्णय घेतला. भरणे यांना आधीपासूनच क्रीडा व युवक कल्याण खाते नको होते. त्यामुळे त्यांनी नाराजी दर्शवली होती. त्यानंतर भरणे यांच्याकडे हे खाते सोपविण्यावर पक्षीय पातळीवर निर्णय घेण्यात आला. त्यानंतर बुधवारी व गुरुवारी राजकीय घडामोडी वेगाने घडल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातही बैठक झाली.
त्यानंतर अजितदादा व सीएम फडणवीस यांच्यातही बैठक झाली. या बैठकीवेळी त्यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी कोकाटे यांच्या राजीनाम्याऐवजी त्यांचे खाते बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीवेळी कोकाटे यांच्याकडील कृषी मंत्रालय काढून ते दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय त्यांनी सीएम फडणवीस यांच्या कानावर घातला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांच्याकडे खाते बदल करण्याविषयी पत्र दिले होते. त्यानुसार कृषी खाते दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपविण्यात आले तर त्यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण खाते कोकाटे यांच्याकडे सोपवले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.