Beed News : परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर न्यायासाठी टाहो फोडणाऱ्या त्यांचा पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अखेर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आपल्या पतीची हत्या करणारे आरोपी अजून मोकाट आहेत, त्यांच्या मुसक्या आवळून आम्हाला न्याय द्या, अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपल्या मुला-बाळांसह मुख्यमंत्र्यांना केली. त्यानंतर लगेच महादेव मुंडे हत्या प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी करण्याचे आदेश फडणवीसांनी दिले. तसेच आरोपींच्या अटकेसाठी बीडच्या पोलीस अधिक्षकांना फोनही केला.
ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या भेटीनंतर महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या चौकशीला आता वेग येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी समाधान व्यक्त केले असून आता आपल्याला न्याय मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिल्यानंतर या प्रकरणात कुणीही असो, त्याला सोडणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) दिला. तसेच हत्येमध्ये सहभागी असणाऱ्यांना अटक करण्याचे आदेशही दिले.
बारा गुंठे जमीनीच्या वादातून महादेव मुंडे यांची वाल्मीक कराड गँगने निर्घृणपणे हत्या केल्या आरोप आहे. 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांची हत्या करून त्यांचा मृतदेह तहसील कार्यालयाच्या मैदानात फेकून देण्यात आला होता. (Beed News) मात्र अद्याप या प्रकरणात एकाही आरोपीला अटक झालेली नाही. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आरोपींच्या अटकेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. मात्र पोलीसांच्या आश्वासनानंतर ते मागे घेत एका महिन्यात आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु पुढे काहीच न झाल्याने काही दिवसापुर्वी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. तो फसल्यानंतर त्यांनी विष प्राशन केले होते.
तत्पुर्वी विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी महादेव मुंडे यांची हत्या कोणी केली? कशी केली? याबाबत महत्वाचे खुलासे व दावे करत आरोपींची नावे माध्यमांसमोर सांगितली होती. पोलीसांनी त्यानंतर बांगर यांचा जबाबही नोंदवून घेतला होता. त्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. दरम्यान, ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांचीही भेट घेतली होती. मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या भेटीला येण्याआधीही त्या जरांगे पाटील यांना भेटून आल्या होत्या.
मुख्यमंत्री भावूक..
महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर गेल्या 21 महिन्यांचा वृत्तांत मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला. हे सर्व ऐकूण मुख्यमंत्री भावुक झाल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी माध्यमांना सांगितले. या प्रकरणात कुणीही असले तरी त्याला सोडणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. या हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमली आणि आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. त्यांनी तात्काळ बीडच्या एसपींना फोन लावला, असेही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले.
पोलिस प्रशासनाला परळीतील बंगल्यावरुन फोन आला आणि त्यांनी तपास थांबवला अशी माहिती आपण मुख्यमंत्र्यांना दिली. तो फोन धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरुन वाल्मिक कराडने केला आहे. यामध्ये अजून कुणी आहे का याचा सीडीआर काढण्याची विनंती आम्ही केली. या हत्येमध्ये ज्या लोकांचा सहभाग आहे त्यांची नावे आपण मुख्यमंत्र्यांना दिली आहेत. यावर कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, सगळ्यांना अटक करणार, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.