

कणकवली नगरपंचायत पराभवानंतर नितेश राणेंनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन कारणांचा अहवाल सादर केला.
नितेश राणेंनी आमदार निलेश राणेंच्या भूमिकेवर अप्रत्यक्ष आक्षेप घेत 16 तारखेनंतर सविस्तर माहिती जाहीर करण्याचे संकेत दिले.
यावर निलेश राणेंनी संयमी प्रतिक्रिया देत, माहिती घेतल्याशिवाय बोलणार नसल्याचे स्पष्ट केले.
Sindhudurg News : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये कणकवलीमध्ये झालेल्या पराभवानंतर भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडियावर एक सूचक पोस्ट करत "गप्प होतो... पण आता बोलण्याची वेळ आलीय, असा इशारा दिला होता. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. तर नितेश राणे यांनी नेमका कोणाला इशारा दिला, यावर तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच आता त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीही घेतली भेट घेतली आहे. तर आपण 16 तारखेनंतर धमाका करणार असल्याचे म्हटलं आहे. यानंतर आता पुन्हा एकदा राज्यभर चर्चांना उधान आलं आहे.
जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला चांगले यश मिळाले असून हे यश आमदार निलेश राणे यांनी कॅश केलं आहे. पण या यशा दरम्यान जिल्ह्यात दोन्ही राणे बंधूंमध्ये राजकीय संघर्ष उफाळला. निलेश राणेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना पाठिंबा दिला. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली. भाजपवर युती झाली नाही म्हणून खापर फोडले.
ज्यानंतर निकालाच्या दुसऱ्या दिवशी नितेश राणे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून खळबळ उडवून दिली. त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये, "गप्प होतो...पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी, पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात. त्यामुळे आता ती वेळ आली आहे," असं म्हणत सूचक इशारा दिला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती.
यावरून राज्यभर चर्चा रंगल्या असतानाच आता पुन्हा एकदा नितेश राणे यांनी 16 तारखेला महापालिका निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर आपण केलेल्या ट्वीटबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. त्याआधी त्यांनी कणकवलीत नगरपंचायत निवडणुकीत भाजपला स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाच्या कारणांची माहिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन दिली. यानंतर ते पत्रकार परिषद घेवून बोलत होते.
यावेळी त्यांनी, आमदार नीलेश राणे यांच्या निवडणुकीतील राजकीय भूमिकेवर आक्षेप घेतला. तर 16 तारखेला महापालिका निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर संपूर्ण माहिती विस्तृतपणे मांडणार असून भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून पक्षाला लागलेले डाग पुसून काढणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता ते 16 तारखेनंतर कोणता धमाका करणार, याकडे कोकणचे लक्ष लागून राहिले आहे.
तसेच त्यांनी यावेळी भाजपचे जिल्ह्यात दोन नगराध्यक्ष आणि 41 नगरसेवक निवडून आले असून कणकवलीत मात्र पराभव पत्कारावा लागला. आम्ही याचे विश्लेषण करत आहोत. कणकवली हा खासदार नारायण राणे यांचा बालेकिल्ला असतानाही त्यांच्याच कुटुंबाची मदत घेऊन समीर नलावडे यांना पाडण्यात आले. महायुती का झाली नाही, याचा विचार आमदार निलेश राणे यांनीच करायला हवा, ज्याची उत्तरेही त्यांच्याकडे आहेत, असेही नितेश राणे यांनी म्हटलं आहे. तर निलेश राणे यांना आमदार करण्यामध्ये शिवसेनेप्रमाणे भाजपचाही मोठा वाटा असून गेल्या अकरा महिन्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना शिव्या देणे, धमक्या देणे असे प्रकार घडल्याचा दावा देखील नितेश राणेंनी केला आहे.
या सर्व घडामोडी दरम्यान नितेश राणेंच्या या पोस्टवर आमदार निलेश राणे यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, नेमकं काय झालंय ते मी माहिती घेतो. माहिती घेतल्याशिवाय बोलू शकत नाही. त्यामुळे माहिती घेतो, ज्या विषयाची माहिती नाही, त्याबाबत काय बोलणार? त्यामुळे काय झालंय मी विचारतो आणि यावर नंतर बोलतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
1) कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा पराभव का झाला?
👉 याबाबत नितेश राणे यांनी कारणांचा आढावा घेतला असून 16 तारखेनंतर माहिती जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.
2) नितेश राणेंनी निलेश राणेंवर थेट आरोप केला आहे का?
👉 थेट आरोप केला नसला तरी त्यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतल्याचे संकेत दिले आहेत.
3) निलेश राणेंची प्रतिक्रिया काय आहे?
👉 “माहिती घेतल्याशिवाय बोलू शकत नाही,” अशी मोजकी आणि सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
4) 16 तारखेला काय विशेष आहे?
👉 महापालिका निवडणुकांची मतमोजणी असून त्यानंतर नितेश राणे सविस्तर खुलासा करणार आहेत.
5) या घडामोडींचा कोकण राजकारणावर काय परिणाम होईल?
👉 भाजपमधील अंतर्गत राजकारण तापले असून आगामी निवडणुकांवर याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.