

दापोली येथे महिला तलाठी श्रद्धा बंडे यांना १० हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
सातबाऱ्यावर खरेदीखताची नोंद करून फेरफार मंजूर करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात या कारवाईमुळे खळबळ उडाली असून संबंधित अधिकारी नुकत्याच शासकीय सेवेत दाखल झाल्या होत्या.
Ratnagiri News : गेल्या दोन दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चिपळूण येथे सापळा रचून पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई केली होती. यामुळे पोलिस प्रशासनासह जिल्ह्यात खलबळ उडाली होती. या घटनेला अद्याप दोन दिवसही होत नाही तोच महिला तलाठी ACBच्या जाळ्यात अडकली आहे. तहसील कार्यालयामध्येच महिला तलाठी रंगेहाथ पकडली गेल्याने महसूल विभागात मोठी चर्चा होत असून कोकणात खाबुगिरीला उत आल्याची कुजबूज सुरू झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दापोली तालुक्यातील तक्रारदार व त्यांच्या मित्रांने मौजे तेरे वायंगणी येथील खाते क्रमांक ७४, गट क्रमांक ३११, क्षेत्र ७८ गुंठे जमीन एकत्रीत खरेदीखताद्वारे विकत घेतली होती. या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर स्वतःचे नावे नोंद करण्यासाठी तक्रारदारांनी तलाठी कार्यालय, सजा नानटे येथे अर्ज केला होता. तसेच याप्रकरणी त्यांनी ग्राम महसुल अधिकारी श्रद्धा बंडे यांची भेट घेतली.
यानंतरच तलाठी बंडे यांना सातबारा उताऱ्यावर खरेदीखताची नोंद करून फेरफार मंजूर करण्यासाठी लाच मागितली होती. तर दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी त्यांनी तक्रारदाराकडे केली होती. याचविरोधात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर ACBच्या रत्नागिरी युनिटने सापळा रचला रचून कारवाई केली. यावेळी दापोली तहसील कार्यालयातील सभागृहात तलाठी बंडे यांना दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना गेहात अटक केली. या घटनेमुळे आता संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून प्रशासन हादरले आहे.
धक्कादायक म्हणजे संशयित श्रद्धा बंडे या मागील वर्षीच शासकीय सेवेत दाखल झाल्या होत्या. त्यांच्यावर झालेल्या या कारवाईनंतर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केला जात आहे. तर तहसील कार्यालयासारख्या शासकीय ठिकाणीच लाच स्वीकारताना त्यांना अटक झाल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. तर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई झाल्याने एकच खळबळ उडालीआहे.
दरम्यान दोन दिवसांच्याआधीच चिपळूण सावर्डे पोलिस स्थानकातील पोलिस उपनिरीक्षक मनिष कांबळे यांच्यावर लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई केली होती. विभागाने चिपळूणात सोमवारी सायंकाळी सापळा रचून ही कारवाई केली होती. ज्यात पोलिस उपनिरीक्षक कांबळे यांच्यावर १५ हजार रूपये लाच प्रकरणी कारवाई केली होती. तर त्यांनी विम्याच्या दाव्यासाठी आवश्यक कादगपत्रे देण्याकरिता तब्बल २५ हजारांची लाच मागितली होती. धक्कादायक म्हणजे त्यांच्या सेवानिवृत्तीला वर्षभराचा कालावधी बाकी असतानाच ही कारवाई झाली.
1. तलाठीला किती रकमेची लाच घेताना अटक करण्यात आली?
१० हजार रुपये घेताना अटक करण्यात आली.
2. कारवाई कोणी केली?
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांनी सापळा रचून कारवाई केली.
3. लाच कोणत्या कामासाठी मागितली होती?
सातबाऱ्यावर खरेदीखताची नोंद व फेरफार मंजुरीसाठी.
4. आरोपी अधिकारी किती काळापासून सेवेत होत्या?
त्या मागील वर्षीच शासकीय सेवेत दाखल झाल्या होत्या.
5. पुढील तपास कोण करणार आहे?
एसीबी रत्नागिरी विभाग पुढील तपास करत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.