Navi Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. यावेळी वादाचे कारण हे क्लस्टर पुनर्विकास योजना असून, याला गणेश नाईक यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच अतिधोकादायक नसलेल्या तसेच ३० वर्षे पूर्ण न झालेल्या इमारतींनाही क्लस्टर योजनेत समाविष्ट करण्यावर आरोप करत थेट त्यांनी इशारा दिला आहे.
नवी मुंबईतील नव्या यूडीसीपीआरमुळे एफएसआय वाढल्यास शहराच्या नियोजनावर गंभीर परिणाम होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. तर माझ्या नादाला लागला तर त्याला त्याची जागा नीट ठेऊ देणार नाही,” असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी दिला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.
गणेश नाईक यांनी, वाशीत झालेल्या एका कार्यक्रमात नवी मुंबईतील क्लस्टर योजना आणि यूडीसीपीआरवरून नाराजी व्यक्त केली. त्यांनी, नगरविकास विभागाच्या अखत्यारीतील क्लस्टर धोरणावर आक्षेप घेतला. तसेच सार्वजनिकपणे प्रश्नचिन्ह उपस्थित करत ठाणे-बेलापूर रस्त्यावर वाहतूक किती वाढली असून, दररोज संध्याकाळी वाहतूक कोंडी हे दिसत नाही का? असा सवाल केला आहे. तर अशा परिस्थितीत यूडीसीपीआरनुसार नवी मुंबईतील सर्वच इमारतींना वाढीव एफएसआय लावला तर लोकांना जगणेही मुश्किल होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
नवी मुंबईची उभारणी नियोजनबद्ध शहर म्हणून झाली असताना, नव्या धोरणामुळे शहराची लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या झपाट्याने वाढेल, असा दावा देखील गणेश नाईक यांनी केला आहे. रस्ते, पार्किंग, पाणीपुरवठा आणि इतर नागरी सुविधांचा विचार न करता या धोरणाला परवानगी दिल्यास त्याचे गंभीर परिणाम नागरिकांना भोगावे लागतील, असा इशारा नाईक यांनी दिला आहे.
आजची परिस्थिती अशी असेल, तर भविष्यात नवी मुंबईत जगण्यासारखे काही उरणार नाही, हे लिहून ठेवा, असा इशारा देत आक्रमक पवित्रा घेतला. तसेच इकडून-तिकडून कारणे शोधून क्लस्टरचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत या भूमिकेला मंत्रिमंडळाच्या बैठकीतच आपण विरोध केला होता. विधानसभेतही ‘हा यूडीसीपीआर कुठल्या शहाण्याने आणला?’ असा प्रश्न उपस्थित केल्याची माहिती त्यांनी दिली. तर गणेश नाईकच्या नादाला लागला, तर त्याला त्याची जागा नीट ठेऊ देणार नाही, असाही अप्रत्यक्ष इशारा नाईक यांनी दिला आहे.
दरम्यान, आता महायुतीतील दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये उघडपणे मतभेद समोर आले असून वनमंत्र्यांनीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या योजनेवर अक्षेप घेतला आहे. तसेच अप्रत्यक्षपणे शिंदे यांनाच इशारा दिल्याने नवी मुंबईतील राजकारणाला नवे वळण आले आहे. तर या संघर्षाची आता राज्यभर याची चर्चा होताना दिसत असून यावर शिंदे नेमकी कोणती प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.