
सिंधुदुर्गात स्थानिक स्वराज्य निवडणुका जवळ आल्याने राजकारण तापले आहे.
नितेश राणेंनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा विचार व्यक्त केला आहे.
या निर्णयामुळे शिंदे गट आणि भाजप यांच्यात मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे.
Sindhudurg News : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून तळकोकणात राजकारण चांगलेच तापू लागले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य पातळीवर महायुतीच्या नेत्यांमध्ये महायुती म्हणूनच लढण्याचे एकमत आहे. मात्र, जिल्हा पातळीवर वेगळेच चित्र दिसत आहे. सिंधुदुर्गमध्येही महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मतभेद निर्माण झाले असून, थेट नेत्यांकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे.
सध्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती राजकीय पक्षांकडून आखली जात आहे. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांना न दुखावता निवडणुका कशा जिंकता येतील, यावर खलबत्ते मुंबईत सुरू आहेत. स्थानिक नेत्यांना विचारात घेऊनच युती किंवा आघाडी करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे संकेत प्रमुख नेत्यांकडून दिले जात आहेत. मात्र, काही ठिकाणी स्थानिक नेते आक्रमकपणे स्वबळाचा नारा देत असल्याने महायुतीत किरकोळ दरी निर्माण होताना दिसत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आता महायुतीत तणाव निर्माण झाला असून भाजपकडून धक्कातंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा आहे. मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा विचार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नितेश राणे यांनी शिंदेंना राजकीय धक्का देण्याचा प्लॅन तयार केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
नितेश राणे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. “सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही मैत्रीपूर्ण लढतीतून निवडणुका लढू. प्रत्येकाला आपली संघटना वाढवण्याचा अधिकार आहे, आणि तशी संधी मिळत असेल तर तिचे स्वागतच करायला हवे,” असे ते म्हणाले. “जर आमची युती झाली, तर उभाठा आणि महाविकास आघाडीला तयार उमेदवार सहज मिळतील,” अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
राणे म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि महायुतीला जिल्ह्यात उमेदवारच नाहीत. त्यामुळे आमची युती होणार की नाही याकडे ते लक्ष ठेवून आहेत. जर युती झाली तर येथे बंडखोरी होईल आणि त्यांना उमेदवार मिळतील या प्रतिक्षेत ते आहेत. त्यामुळे प्रत्येकाने स्वबळावर लढावे. एकमेकांवर टीका न करता मैत्रीपूर्ण लढती लढवाव्यात,” असे आवाहनही महायुतीतील सर्व पक्षांना त्यांनी केले.
यावेळी नितेश राणे म्हणाले, “शिवसेना आणि भाजपचे नेते परिपक्व आहेत. उद्या राज्याच्या हितासाठी आम्ही पुन्हा एकत्र येऊ शकतो. त्यामुळेच सध्या जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना स्वबळावर निवडणुकीची तयारी करत आहे,” असे सांगत त्यांनी एकप्रकारे स्वबळाचा नारा दिला.
दरम्यान, नितेश राणे यांनी भाजपच्या संदर्भात दिलेला स्वबळाचा नारा हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का देणारा असल्याची चर्चा आहे. राज्याच्या राजकीय पटलावर तयार होत असलेला “सिंधुदुर्ग पॅटर्न” पुढे राज्यातील इतर ठिकाणीही राबवला जाणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
प्र.१: नितेश राणे यांनी कोणता निर्णय घेतला आहे?
उ.१: त्यांनी सिंधुदुर्गातील स्थानिक निवडणुका स्वबळावर लढवण्याचा विचार व्यक्त केला आहे.
प्र.२: या निर्णयामुळे कोणावर परिणाम होऊ शकतो?
उ.२: या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे.
प्र.३: भाजप आणि शिंदे सेना युतीमध्ये मतभेद आहेत का?
उ.३: होय, स्थानिक पातळीवर काही मतभेद उघडकीस येत आहेत.
प्र.४: महायुती नेते या परिस्थितीकडे कसे पाहत आहेत?
उ.४: राज्यस्तरावर नेते युती कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण स्थानिक पातळीवर तणाव दिसत आहे.
प्र.५: सिंधुदुर्ग पॅटर्न इतर ठिकाणी लागू होणार का?
उ.५: सध्या तरी निश्चित नाही, पण राज्यात अशा प्रकारच्या शक्यता नाकारता येत नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.