

नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथे अटक करण्यात आली आहे.
आरोपीला एमआयएमशी संबंधित काही नेत्यांनी संरक्षण दिल्याचा आरोप होत असून राजकीय वातावरण तापले आहे.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Palghar News : नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथे अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर आता मोठा राजकीय गदारोळ सुरू झाला असून एमआयएम पक्षाशी संबंधित काही व्यक्ती आणि नगरसेवक मतीन पटेल तसेच माजी खासदार इम्तियाज जलील यांनीच आरोपी निदा खानला संरक्षण दिल्याचा आरोप केला जात आहे. यावरून शिवसेना आक्रमक झाली असतानाच भाजपने देखील यात उडी घेतली आहे. मंत्री नितेश राणे यांनी यावरून गंभीर आरोप करत एमआयएम पक्षावर थेट बंदी घालण्याची मागणी केली आहे.
नाशिकच्या टीसीएस प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. निदा खानला कथित संरक्षण दिल्याचा आरोप एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याच्यावर होत आहे. यानंतर एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याला या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले आहे. यानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण आता आणखी तापले असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गंभीर आरोप केले आहेत.
शिरसाट यांनी या प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यांनी एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील हे निदा खानला नाशिकला जाऊन भेटले होते, असा धक्कादायक आरोप केला.
तसेच या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणीही केली. या नवा आरोपामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली असतानाच भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी देखील एमआयएम आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार निशाना साधला आहे.
पालघरमधील सातपाटी येथे झालेल्या कार्यक्रमात, मंत्री नितेश राणे यांनी निदा खानला कथित संरक्षण दिल्यावरून एमआयएम पक्षावर थेट बंदी घालण्याची मागणी केली. तसेच नितेश राणे यांनी एमआयएम पक्षाची तुलना थेट पाकिस्तानच्या पीएफआय, आयएसआय आणि अल कायदासारख्या संघटनांशी केली.
तर एमआयएम हा पक्ष राजकीय, सामाजिक नसून तो जिहादी आहे. हा पक्ष राजकीय, सामाजिक काम करण्यासाठी नसून तो जिहाद पसरवण्यासाठी? आहे का असाही सवाल त्यांनी यावेळी केला आहे. तसेच निदा खान ही फक्त “मुखवटा” असून कॉर्पोरेट जिहादच्या माध्यमातून हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्याचे कट-कारस्थान रचले जात आहे, असाही दावा नितेश राणे यांनी केला आहे.
तर वंदे मातरम् आणि राष्ट्रगीतावरून देखील त्यांनी सुनावले आहे. वंदे मातरम् आणि राष्ट्रगीत हे देशाचे गीत आहे. ज्याला हे म्हणायचे नसेल त्याने पाकिस्तानमध्ये निघून जावे, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. सध्या नाशिकच्या टीसीएस प्रकरणावरून शिवसेना एमआयएम दोन्ही पक्ष आमने-सामने आले असतानाच आता भाजपने देखील एमआयएमवर जिहादी पक्ष म्हणून टीका केली आहे. यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथे अटक करण्यात आली.
एमआयएमशी संबंधित काही व्यक्तींनी आरोपीला संरक्षण दिल्याचा आरोप झाल्यामुळे वाद निर्माण झाला.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे SIT चौकशीची मागणी केली आहे.
नितेश राणे यांनी एमआयएम पक्षावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणावरून शिवसेना, भाजप आणि एमआयएम यांच्यात तीव्र राजकीय संघर्ष सुरू झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.