

रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक १२ मार्च रोजी होणार असून यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला सत्तास्थापनेतून दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली वेगात सुरू असून अलिबागमध्ये जल्लोषाची तयारी केली जात आहे.
raigad ZP politics : रायगड जिल्हा परिषदेमधील सत्ता स्थापनेची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड १२ मार्च रोजी होणार आहे. यासाठी १२ मार्च रोजी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. तसा कार्यक्रम रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केला आहे. या विशेष सभेतच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड होणार असून जिल्हा परिषदेचे पुढील नेतृत्व कोणाकडे जाणार याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेनेकडून महायुतीसाठी व्यापक प्रयत्न केले गेले आहेत. मात्र सत्ता स्थापनेत शिवसेनेला सोबत घेण्यास भाजपसह राष्ट्रवादी इच्छुक दिसत नाही. यामुळेच शिवसेनेला दूर ठेवून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग दिला जात आहे. तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलिबागमध्ये आनंदोत्सवाची तयारी सुरू भाजप आणि राष्ट्रवादीने केल्याने शिवसेनेच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरली आहे.
रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या नियुक्तीसाठी १२ मार्च रोजी विशेष सभा होणार आहे. या निवडणुकीला अवघे दोन दिवस उरले असतानाच येथे राजकारणातील महा ड्रामा पहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला भाजप-राष्ट्रवादीने नाकारल्याचे आता स्पष्ट होताना दिसत असून दोन्ही पक्षांची युती झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या असून अलिबागमध्ये आनंदोत्सवाची जय्यत तयारी दिसत आहे. मात्र तयारीने शिवसेनेच्या गोटात शांतता पसरली असून वादापूर्वीची शांतता असल्याचे जानकार बोलत आहेत. तर राष्ट्रवादीने खेळलेल्या या खेळीचे परिणाम आगामी लोकसभा आणि विधानसभेबरोबर आता होणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परीषदेची निवडणूक ७ फेब्रुवारीला झाली. यानंतर लगेच निकाल ९ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. ज्यात सर्वाधिक जागा शिंदेंच्या शिवसेनेनं (२१) जिंकल्या. त्यापाठोपाठ भाजपला १५, राष्ट्रवादी काँग्रेस १६, शिवसेना ठाकरे गट ५ , काँग्रेसला २ जागा मिळाल्या आहेत. यानंतर येथे त्रिशंकु स्थिती निर्माण झाली असून राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेचा दावा केला. तर या वेळी आपण भाजपला सोबत घेणार असल्याचे भरत गोगावले यांनी म्हणत सत्ता स्थापनेचा दावा ठोकला.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करेल असे जाहीर करत भाजपकडून देखील ते वधवून घेतले. फक्त शिवसेना जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपला अध्यक्ष पद देण्याची तयारी ठेवली. तर ठाकरेंच्या शिवसेनेलाही सोबत घेण्याचे संकेत दिले. यामुळेच आता रायगड जिल्हा परीषदेच्या सर्वाधिक जागा निवडून येऊनही शिवसेनेला सत्तेपासून दूर राहावे लागणार आहे.
दरम्यान स्थानिक पातळीवर भाजपसह राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांशी चर्चेचे मार्ग बंद झाल्याने शिवसेनेची कोंडी झाली. यामुळे शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांची मनधरणी करत महायुती म्हणूनच जिल्ह्यात विचार व्हावा. सत्तेत शिवसेनेला वाटा मिळावा अशी मागणी केली. एकनाथ शिंदे यांनीही जिल्हा परिषदेत महायुती व्हावी यासाठी प्रयत्न केले. मात्र शिंदेंचेही प्रयत्न फसल्याचे दिसत असून भाजप आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला दूर ठेवत सत्ता स्थापनेसाठी पाऊले उचल्याचे दिसत आहे.
आता अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवड दोन दिवसांवर आली असून आपलाच अध्यक्ष होणार हे गृहित धरत भाजपने आनंदोत्सवाची जय्यत तयारी केली आहे. अलिबाग समुद्रकिनारी असलेल्या मैदानावर भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचा विजयी मेळावा होणार असून त्यासाठी भव्य मंडप उभारला जात आहे. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे उपस्थित राहणार आहेत. सध्या या आनंदोत्सवाची जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे.
आता या आनंदोत्सवाच्या चर्चांवर शिवसेना नेते तथा मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, अध्यक्षपदाची निवडणूक १२ तारखेला होणार असून याला अजून अवधी आहे. या दोन दिवसांच्या कालावधीत बऱ्याच राजकीय घडामोडी होतील. आत्ताच यावर बोलणं योग्य नाही. पण जिल्हा परिषदेमधील सत्ता स्थापनेबाबत काय निर्णय होतो यावर आम्ही आमची बाजू ११ तारखेला मांडू, आमची भूमिका स्पष्ट करू असे त्यांनी म्हटले आहे.
FAQs :
1. रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक कधी होणार आहे?
१२ मार्च रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक होणार आहे.
2. या निवडणुकीसाठी काय व्यवस्था करण्यात आली आहे?
नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा बोलावण्यात आली आहे.
3. रायगड जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत?
शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत.
4. सत्ता स्थापनेसाठी कोणते पक्ष हालचाल करत आहेत?
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहेत.
5. या निवडणुकीकडे का लक्ष लागले आहे?
जिल्हा परिषदेचे पुढील नेतृत्व कोणाकडे जाणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.