

Ratnagiri ZP : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या मंडणगड तालुक्यातील अनुभवी सदस्या अस्मिता केंद्रे यांची तर संगमेश्वरचे ज्येष्ठ सदस्य विलास चाळके यांची उपाध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाली. सोमवारी (16 मार्च) जिल्हा परिषदेच्या 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
नूतन अध्यक्ष अस्मिता केंद्रे या मंडणगड तालुक्यातील अभ्यासू सदस्या म्हणून ओळखल्या जातात. 1987 पासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या केंद्रे यांनी यापूर्वी मंडणगड तालुका समन्वय समिती, कोकण म्हाडाचे सदस्य आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण व वित्त समितीत काम केले आहे.
तर नूतन उपाध्यक्ष विलास चाळके यांना प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे. चाळके यांनी यापूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद भूषवले असून, जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि अर्थ सभापती म्हणूनही त्यांनी आपली छाप पाडली आहे. त्यांच्या रुपाने शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांच्या मतदारसंघात ताकद वाढविल्याचे बोलले जाते.
नेत्रा ठाकूर यांना सव्वा वर्षानंतर मिळणार संधी?
शिवसेनेकडून अस्मिता केंद्रे यांच्यासोबतच गुहागरच्या नेत्रा ठाकूर यांचेही नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत होते. पण ऐनवेळी केंद्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. आता नेत्रा ठाकूर यांना सव्वा वर्षानंतर संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यातून गुहागरमध्ये अध्यक्षपद देण्याचा शिवसेनेचा विचार असणार आहे.
गत विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भास्कर जाधव यांच्याविरोधात राजेश बेंडल यांचा अवघ्या 2800 मतांनी पराभव झाला. पण पुढच्या विधानसभा निवडणुकीत गुहागर जिंकू शकतो, असा शिवसेना नेत्यांचा मानस आहे. त्यामुळेच गुहागरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपद देऊन तिथे ताकद वाढवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे.
सामान्यांना न्याय देण्याचा विश्वास: योगेश कदम
या निवडीनंतर आनंद व्यक्त करताना मंत्री योगेश कदम म्हणाले की, "निवडून आलेले दोन्ही पदाधिकारी अत्यंत अनुभवी आणि मनमिळाऊ स्वभावाचे आहेत. सर्वांना बरोबर घेऊन संघटना वाढीसाठी ते प्रयत्न करतील. शिवसेनेचा झंझावात निर्माण करत ग्रामीण भागातील सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम हे दोन्ही पदाधिकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे."
जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणे हेच आपले मुख्य ध्येय आहे , ग्रामीण भागातील रस्ते, पाणी आणि आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार आहोत, अशी प्रतिक्रिया अस्मिता केंद्रे यांनी दिली. तर सर्वसामान्यांचा उपाध्यक्ष' म्हणून काम करणार असा आशावाद विलास चाळके यांनी व्यक्त केला. "हे पद म्हणजे केवळ सत्कार स्वीकारण्यासाठी नसून जनतेची सेवा करण्यासाठी आहे. सर्व सदस्यांना सोबत घेऊन जिल्ह्याचा विकास आराखडा राबवणार," असे त्यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.