
उद्धव ठाकरे यांनी आमदार भास्कर जाधव यांचे सुपूत्र विक्रांत जाधव यांची उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.
या निर्णयाने जाधव कुटुंबाच्या पक्ष बदलाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.
ठाकरेंनी स्थानिक निवडणुकांपूर्वी राजकीय रणनीतीचा मास्टर स्ट्रोक खेळल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.
Uddhav Thackeray Ratnagiri politics : तळकोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कधीकाळी भक्कम असणारी शिवसेना आज संपत चालली आहे. याला कारणीभूत दुभंगलेली शिवसेना असली तरी तळकोकणात भाजपसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वाढते प्रस्थ आहे. तर दुसरे कारण म्हणजे उद्धव ठाकरेंसह वरिष्ठ नेत्यांचे झालेले दुर्लक्ष. यामुळे येथे शिवसेनेला घरघर लागल्याचा आरोप दुसऱ्या पक्षात जाणारे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते करताना दिसत आहेत. या आरोपांच्या दरम्यान आणि आगामी स्थानिकच्या आधीच ठाकरेंनी रत्नागिरीत महत्वाची नियुक्ती करत मेगा प्लॅन आखल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी तळकोकणातील शिवसेनेचे एकमेव आमदार भास्कर जाधव यांचे सुपूत्र विक्रांत जाधव यांची उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी निवड करून मास्टर स्ट्रोक खेळल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
कोकण असो की तळकोकण हा कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. यातील तळकोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे महत्वाचे बुरूज. येथे खासदार आणि 7 आमदार होते. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना फुटली आणि शिवसेनेच्या या गडाचे दोन्ही बुरूजही ढासळले.
पक्ष फुटताच अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वळचणीला गेले. आता भास्कर जाधव हे शिवसेनेचे एकमेव आमदार असून ते विधानसभेत शिवसेनेची कमान सांभाळत आहे. तर माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक आपल्या ताकदीने खिंड लढवताना दिसत आहेत. मात्र या नेत्यांना शिवसेनेला लागलेली गळती अद्याप रोखता आलेली नाही.
एकीकडे पक्षाला गळती लागली असून पक्षाचे वरिष्ठांसह स्थानिक नेत्यांचे दुर्लक्ष होत आहे. आमदार भास्कर जाधव आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्यात अलबेल आहेत. अशा चर्चा सुरू असनाताच आता ठाकरेंनी आमदार भास्कर जाधव यांचे सुपूत्र विक्रांत जाधव यांची उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी निवड करून मास्टर स्ट्रोक खेळल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
ठाकरेंची ही नियुक्ती सध्या चर्चेचा विषय बनला असून भास्कर जाधव यांचे पाय ठाकरेंनी बांधले की त्यांचे हात मजबूत केले असा सवाल आता येथे विचारला जातोय. तर या नियुक्ती मागे अनेक राजकीय कांगोरे असल्याचेही आता बोलले जात आहे. तसेच ही नियुक्ती करण्यामागे भास्कर जाधव शिवसेना सोडून कोठेही जावू नयेत, त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेंना ब्रेक लागावा आणि शिवसेना पक्ष बाधंणीला वेग यावा अशा शक्यता आता वर्तवल्या जात आहेत.
मध्यंतरी भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. या चर्चेमागे त्यांना हवे असणारे विरोधीपक्ष नेते पद होते. हे पद त्यांना न मिळो यासाठी स्व पक्षासह भाजप आणि शिवसेनेचा विरोध असल्याची चर्चा होती. मविआ काळात तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधवांनी भाजपच्या आमदारांचं केलेलं निलंबन आणि शिवसेना फुटीनंतर जाधवांनी एकनाथ शिंदेंवर केलेली टोकाची टीका ही दोन्ही कारणे यासाठी कारणीभूत असल्याचे संकेत देत होते. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्याही चर्चा त्यांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या आड येत होत्या. यामुळेच त्यांनी उघड नाराजीही व्यक्त केली होती.
भास्कर जाधव यांनी, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानंतर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. शिवसैनिकांच्या मेळाव्यात त्यांनी आपल्या नाराजीला वाट करून देत, मला काम करण्याची संधी कमी मिळतेय. याचा अर्थ माझ्यात काहीतरी दोष आहे. अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त केली होती. तसेच आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत देताना आठ-आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर असे वाटते की आता थांबायचा विचार करावा? यापेक्षा वेगळं काही कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. ज्यामुळे भास्कर जाधव भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या.
या सर्व चर्चा आणि रत्नागिरीत पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी पक्षाची नवी बांधणी करण्यासाठी ठाकरेंनी जाधव यांचे सुपूत्र विक्रांत जाधव यांची उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी निवड केली. त्यांच्या या निवडणीमुळे आता भास्कर जाधव यांच्या सर्व शक्यतांना ब्रेक लागला आहेच. सोबत आगामी स्थानिकसाठी भास्कर जाधव यांना बळ देखील मिळाले आहे.
ठाकरेंनी विक्रांत जाधव यांच्या नियुक्तीने शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण केला असून चिपळूण, गुहागरसह जिल्ह्यात शिवसेनेच्या डॅमेज कंट्रोलकडेही लक्ष दिले आहे. विक्रांत जाधव रत्नागिरी जिल्हा परिषदचे अध्यक्ष राहिले असून त्यांना स्थानिकमधील राजकारणाची जाण आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाकडून व्यक्त केला जात आहे. विक्रांत जाधव यांच्या नेतृत्वामुळे युवा पिढीला प्रेरणा मिळेल आणि रत्नागिरी जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाला नवी दिशा मिळेल, असाही दावा पक्षाकडून केला जात आहे.
1. विक्रांत जाधव कोण आहेत?
विक्रांत जाधव हे आमदार भास्कर जाधव यांचे सुपूत्र असून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख झाले आहेत.
2. त्यांची नियुक्ती कोणी केली?
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विक्रांत जाधव यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे.
3. या निर्णयामागे राजकीय हेतू काय आहे?
स्थानिक निवडणुका लक्षात घेऊन ठाकरे यांनी पक्षबदलाच्या चर्चांना पूर्णविराम देत संघटन मजबूत करण्याची रणनीती आखली आहे.
4. भास्कर जाधव कोणत्या पक्षाचे आमदार आहेत?
ते शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे आमदार आहेत.
5. या निर्णयाचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
या निर्णयामुळे ठाकरे गटाला रत्नागिरी जिल्ह्यात संघटनात्मक बळ मिळेल आणि कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.