

Konkan MLC Election Controversy News : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कोकण विभाग मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली. पण आता या बिनविरोधावरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेले वक्तव्य सध्या संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीत आपले कोणतेही योगदान नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्यावेळी नेत्यांनी घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कोकण विभाग मतदारसंघात जोरदार राजकीय घडामोडी झाल्या. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. पण ऐनवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सूत्रे हलली आणि मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी शेवटच्या क्षणी अचानक माघार घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणासह महाविकास आघाडीत राजकीय भूकंप झाला. बाळ माने यांच्या या माघारीनंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली.
या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अनिकेत तटकरे यांच्या विजयाचे श्रेय उद्योगमंत्री उदय सामंत यांना दिले. मात्र, आता उदय सामंत यांनी तटकरेंचा हा दावा फेटाळत या विजयात आपले कोणतेही योगदान नसल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यामुळे आता कोकणातील महायुतीत नव्या वादाला तोंड फुटल्याची चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी सामंत म्हणाले, "अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीत माझे कोणतेही योगदान नाही. त्यावेळी माघारीविषयी कोणतीच माहिती मला दिलेली नव्हती. कोकणची जागा बिनविरोधच करायची होती तर पालकमंत्री म्हणून मला कल्पना द्यायला हवी होती. पाच वेळा मी पराभूत केलेल्या त्या उमेदवाराबाबत एवढा मोठा निर्णय घेताना मला विश्वासात घेणे किंवा पूर्वकल्पना देणे गरजेचे होते," अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच ही माहिती आपल्यापासून का लपवून ठेवली, असा सवाल करत याचे कारण आपल्याला माहिती नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच अनिकेत तटकरे यांच्या विजयाचे श्रेय घेण्यासही त्यांनी नकार दिला.
सामंत म्हणाले, "कोकण विभाग मतदारसंघाच्या जागावाटपाच्या सुरुवातीच्या चर्चेत मी सहभागी होतो. त्यावेळी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत सविस्तर चर्चा झाली होती. रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेचे भरत गोगावले यांना मिळावे आणि त्या बदल्यात कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात यावी, असे ठरले होते."
मात्र, आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महेंद्र दळवी यांच्याशी सकारात्मक चर्चा करून जुईली दळवी यांचा अर्ज मागे घेण्यात आला. त्यानंतर बाळ माने आणि अनिकेत तटकरे यांच्यात थेट लढत होईल, असेच चित्र होते. तसे झाले असते, तर तटकरेच मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असते.
"पण त्या दिवशी मी परभणीत प्रचारासाठी असताना सोशल मीडियावर महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या माघारीची बातमी पाहिली. माघारीसंदर्भातील कोणतीही माहिती मला नव्हती. पालकमंत्री म्हणून मला याबाबत कोणतीही कल्पना दिलेली नव्हती," असेही सामंत यांनी सांगितले.
अंतर्गत नाराजी
भाजप नेते तथा मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या थेट पुढाकारामुळेच महाविकास आघाडीचे बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर माने यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आणि त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, ते मध्यंतरी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनाही भेटले होते. या सर्व घडामोडींमध्ये उदय सामंत यांना जाणीवपूर्वक अलिप्त ठेवत त्यांना राजकीय शह देण्यासाठी या राजकीय खेळी केल्या जात असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.