Mumbai News : लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन महिनाभराचा कालावधी लोटला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सत्ताधारी व विरोधकांनी सोडली नाही. त्यामुळे प्रचार शिगेला पोचला होता. वाढत्या तापमानासोबतच ऐन उन्हाळ्यात निवडणुकांमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी देशभरात 102 मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांत पहिल्या टप्प्यात शुक्रवारी 19 एप्रिलला मतदान होत आहे. या पाच मतदारसंघांतील शिगेला पोचलेला प्रचार बुधवारी सायंकाळी पाच वाजता थंडावला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या उमेदवारीमुळे नागपूर मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. (Lok Sabha Election 2024 News)
यामध्ये विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली- चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या पाचही लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारासाठी जोर लावला आहे. त्यामुळे शुक्रवारी याठिकाणी मतदान होणार असून, या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.
विदर्भातील या पाचही लोकसभा मतदारसंघांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दोन ठिकाणी सभा घेतल्या. यातील पहिली सभा चंद्रपूर, तर दुसरी सभा रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये झाली आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचीदेखील एक सभा पार पडली. त्यासोबतच केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit shah) यांची एक सभा झाली, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक सभा पार पडली.
विदर्भातील या पाचही लोकसभा मतदारांचा कौल 19 एप्रिल रोजी ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने तिथे मतदानासाठी सुरक्षेविषयी काळजी घेतली जात आहे. या पाचपैकी फक्त रामटेक मतदारसंघात काँग्रेस व शिंदे सेनेची लढत होणार आहे. उर्वरित चारही मतदारसंघांत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी चुरशीची लढत हॊणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मतदान होत असतानाच राज्यात महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी लढत होत आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देखील महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. त्यामुळे या वेळी राज्यातील लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने जागावाटपाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम आहे. त्यातच अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये अद्याप उमेदवारांची घोषणादेखील करण्यात आलेली नाही. त्यामुळे महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच निर्माण झाला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महायुतीमधील आठ जागांचा तिढा कधी सुटणार याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसने मुंबईतील जागेवरील दोन उमेदवारांची घोषणा केलेली नाही.
R