Political News : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर जवळपास सहा टप्प्यातील मतदान पार पडले. आता शेवटचा एक टप्पा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आता सर्वांना 4 जूनच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे आतापासनूच सर्वच पक्षाची धाकधूक वाढली आहे. सहावा टप्पा शनिवारी पार पडला. यामध्ये सात राज्य केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या 58 जागांसाठी मतदान झाले.
सहाव्या टप्प्यात देशातील लोकसभेच्या (Lok Sabha Election) 543 जागांपैकी 486 म्हणजे जवळपास 90 टक्के मतदारसंघातील मतदान आता पार पडले आहे. उर्वरित एक टप्प्यांमध्ये केवळ 66 मतदारसंघ शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
काही मतदार संघात घटलेला टक्का तर काही ठिकाणी वाढलेला मतदानाचा टक्का कोणाच्या मदतीला येणार व कोणाच्या पथ्यावर पडणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचा फायदा होणार की महाविकास आघाडीचा हे समजून येण्यासाठी सर्वांना 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे.
राज्यातील 18 मंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात 5.11 टक्के वाढ झाली. तर रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या डोंबिवली मतदारसंघात 9.56 टक्के मतदान जादा झाले आहे. तर अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात 5.19 टक्के अधिक मतदान झाले आहे. छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात 4.4 टक्के जास्त मतदान झाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यासोबतच विजयकुमार गावित यांच्या नंदुरबार मतदारसंघात 4.31 टक्के मतदान अधिक झाले. धनंजय मुंडे यांच्या परळीत 4.28 टक्के मतदान जादा झाले. सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूरमध्ये 4.26 टक्के मतदान वाढले. अनिल पाटील यांच्या अमेळनरमध्ये 2.21 टक्के मतदान जास्त झाले. गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीणमध्ये 2.24 टक्के जास्तीचे मतदान झाले. चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूडमध्ये 2.18 टक्के अधिकचे मतदान झाले.
संजय राठोड यांच्या दिग्रसमध्ये 2.09 टक्के वाढले तर संजय बनसोडे यांच्या उदगीरमध्ये 2.01 टक्के अधिक मतदान झाले. दादा भुसे यांच्या मालेगावमध्ये दोन टक्के वाढ झाली तर संदीपान भुमरे यांच्या पैठणमध्ये 1.88% टक्के, दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीमध्ये 1.16 टक्के, शंभूराज देसाई यांच्या पाटणमध्ये 0.73% टक्के, सुरेश खाडे यांच्या मिरजमध्ये 0.48 टक्के, हसन मुश्रीफ यांच्या कागलमध्ये 0.43 टक्के तर गिरीश महाजन यांच्या जामनेरमध्ये 0.21 टक्के अधिकचे मतदान झाले. त्यामुळे येत्या काळात हा वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.