

Maharashtra Government News : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील (DCC Bank) चतुर्थ श्रेणीतील शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत राज्य सरकारने महत्त्वाचे बदल केले आहेत. शिपाई पदासाठी आता 70 गुणांची लेखी परीक्षा आणि 30 गुणांची मौखिक परीक्षा (मुलाखत) घेण्यात येणार आहे. तसेच या पदभरतीत संबंधित जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना 100 टक्के प्राधान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
याबाबत सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने सोमवारी (6 जुलै) शासन निर्णय जारी केला आहे. यात यापूर्वी 22 जून 2026 रोजी जारी करण्यात आलेला शासन निर्णय रद्द करून हा सुधारित निर्णय लागू करण्यात आला असून, त्यानुसार 2018 आणि 2022 च्या शासन निर्णयांमध्येही आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत.
या नवीन निर्णयानुसार, शिपाई पदाची भरती ऑनलाइन प्रक्रियेतून न करता संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ऑफलाइन पद्धतीने केली जाईल. उमेदवारांची लेखी परीक्षा अनुभवी आणि तज्ज्ञ संस्थेमार्फत घेणे बंधनकारक राहणार आहे.
परीक्षेत कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची जबाबदारी संबंधित बँकेच्या संचालक मंडळावर राहील. गैरप्रकार आढळल्यास संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही शासनाने दिला आहे.
सरकारने शिपाई पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण अशी निश्चित केली आहे. तसेच भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेला 70 गुण आणि मुलाखतीला 30 गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याबाबतही शासनाने स्पष्ट भूमिका घेतली आहे.
संबंधित जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना शंभर टक्के प्राधान्य दिले जाईल. मात्र, पुरेशा संख्येने स्थानिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास उर्वरित पदे जिल्ह्याबाहेरील उमेदवारांमधून भरता येणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.