
Nagpur News: महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. अजूनही महायुतीचे नेते या घोषणेवर ठाम आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्व सहकारी बँकांना कर्जवसुली करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यावरून यंदातरी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचे स्पष्ट होते.
दुसरीकडे मागील वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संत्रा पिकांचे मोठे नुकसान झाले होते. संत्रा शेतकऱ्यांना आवाहन करून सेतू केंद्रातून ई-केवायसी करायला सांगण्यात आले होते. सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतरही अद्याप भरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे कर्जमाफी कशी करायची असा सवाल संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा आहे. विशेष म्हणजे मोर्शी तालुक्यात या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसच करीत आहे.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुका विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. अतिवृष्टीमुळे संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले होते. दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही अद्याप भरपाई देण्यात आली नाही. सरकारने त्वरित संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात फळगळती अनुदान मदत तत्काळ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
आंबिया बहराच्या संत्र्याची गळती होऊन शिल्लक राहिलेला संत्रा कवडीमोल भावाने विकावा लागला. दुसरीकडे तालुक्यातील संत्रा बागांवर मृग बहार संत्रा नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. कृषी कर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. शेतकऱ्यांना कृषी कर्ज भरायचे असल्याने त्याकरिता या अनुदानाची रक्कम मिळेल व आपल्या जवळील काही रक्कम टाकून कर्जाची परतफेड करता येईल, असा विचार संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केला होता. ही नुकसान भरपाई आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अन्यथा अन्नत्याग आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.
महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी आम्ही दिलेले सर्व आश्वासने पूर्ण करणार असल्याचे सभागृहात सांगितले होते. यात शेतकऱ्यांच्या कर्जामाफीचाही समावेश असल्याचे ते म्हणाले होते. मात्र त्याची तारीख त्यांनी सांगितली नव्हती. आता सर्व जिल्हा सहकारी बँकांनी शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली सुरू केली आहे. राज्याचे कृषिमंत्री मनोहर कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीच्या रकमेतून लग्न, साखरपुडे उरकतात असे वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये महायुती सरकारच्या विरोधात रोष वाढत चालला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.