Pune News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची बहुप्रतिक्षित पहिली यादी अखेर जाहीर झाली असून, दुसऱ्या यादीची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
कर्जमाफीची दुसरी यादी बाबतची घोषणा राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी केली आहे. दरम्यान, पहिल्या यादीत समाविष्ट असलेल्या पुणे जिल्ह्यातील ६४ हजार ६६४ शेतकऱ्यांसह राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार आहे.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीची सविस्तर माहिती दिली आहे.
पहिल्या यादीतून वंचित राहिलेल्या किंवा ज्यांचे अर्ज प्रक्रियेत आहेत, अशा शेतकऱ्यांचे लक्ष दुसऱ्या यादीकडे लागले आहे. ही दुसरी यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात महा-आयटीच्या पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल. राज्यातील बँकांनी महा-आयटी प्रणालीवर सुमारे ३१.१७ लाख कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. त्यातून पुढील टप्प्यातील पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील १६ लाख ९६ हजार लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी सुमारे १३ हजार ६०० कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील ६४ हजार ६६४ कर्जदारांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळाला आहे. पहिल्या यादीत संपूर्ण राज्यात सर्वाधिक १,३२,७३४ लाभार्थी अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत.
सहकार आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या यादीत केवळ २ लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या कर्जखात्यांचाच समावेश करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज २ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांची खाती उर्वरित वर्गवारीत येतात, त्यांचा समावेश पुढील टप्प्यांत प्रसिद्ध होणाऱ्या याद्यांमध्ये टप्प्याटप्प्याने केला जाईल.
पहिल्या यादीतील सुमारे ४ लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. येत्या चार दिवसांत उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण केले जाईल. ही प्रक्रिया पूर्ण होताच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर कर्जमाफीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत आलेली नाहीत, त्यांनी घाबरून न जाता जिल्हास्तरीय समिती किंवा संबंधित तहसीलदार कार्यालयाकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन सहकार प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
व्यापारी बँकांकडून एनपीए झालेल्या कर्जखात्यांना कालावधीनुसार ३५ टक्क्यांपासून ते ८५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या यादीतील रक्कम ही तडजोडीची रक्कम असून, त्यातील पात्र शेतकऱ्यांच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या थकबाकीची भरपाई राज्य शासन करणार आहे. तसेच १ एप्रिलनंतर या खात्यांवर अतिरिक्त व्याज आकारू नये, असे स्पष्ट निर्देश व्यापारी बँकांना देण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.