Maharashtra Politics Live Update: मोठी बातमी: उपमुख्यमंंत्री एकनाथ शिंदे तातडीनं दिल्लीला रवाना; जागावाटपाचा तिढा दिल्लीत सुटणार?

Maharashtra Breaking News Today LIVE 23 May : पेट्रोल डिझेलच्य दरात तिसऱ्यांदा वाढ, ग्रामीण भागात डिझेलची टंचाई, अशोक खरातच्या साथीदाराची ईडीकडून चौकशी, यासह राज्य आणि देशभरातली महत्वाच्या राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

मोठी बातमी: उपमुख्यमंंत्री एकनाथ शिंदे तातडीनं दिल्लीला रवाना; जागावाटपाचा तिढा दिल्लीत सुटणार? 

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागं मोठी खलबतं सुरू आहेत खासकरून जागावाटपाचा पेच अद्यापही सुटला नसल्याचं समोर येत आहे.महायुतीत 17 पैकी 16 जागांवर सर्व पक्षांचं एकमत झालं असून अवघ्या एका जागेवर शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही पक्ष अडून बसल्याची माहिती समोर येत आहे. याचदरम्यान,उपमुख्यमंंत्री एकनाथ शिंदे तातडीनं दिल्लीला रवाना झाले असल्याचं बोललं जात आहे. जागावाटपाचा तिढा हा दिल्ली दरबारी सुटण्याची शक्यता वर्तवला जात आहे.

पश्चिम बंगालमधील नव्या भाजप सरकारचा बकरी ईदबाबत महत्त्वाचा निर्णय

पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झाल्यानंतर भाजपची बकरी ईदबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. ममता बॅनर्जी यांच्या सरकारनं ईदनिमित्त दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली होती. पण आता भाजपच्या नव्या सरकारनं तृणमूल काँग्रेस सरकारचा निर्णय बदलला आहे. आता एकच दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे.

महायुतीचा विधानपरिषदेच्या 17 जागांवर महायुती जिंकणार: महसूलमंत्री बावनकुळे 

विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होत आहे. यानिमित्तानं मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहे. याचदरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी महायुती संदर्भातला निर्णय अंतिम टप्प्यात आला असून यावर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री एकत्र बसून चर्चा करणार असल्याचं सांगितलं. तसेच महायुती 17 जागेवर महायुती जिंकेल आणि मोठा विजय होईल.

विलिनीकरणासंदर्भात बोलणाऱ्यांच्या भूमिकेने आम्ही अचंबित झालो : मुश्रीफांना शिंदेंचे उत्तर बात बहुत दूर तक जायेगी

विलिनीकरणासंदर्भात कायम बोलणारी मंडळी विलिनीकरण होणार नाही, असे सांगत असल्याने आम्हीसुद्धा अचंबित झालो आहोत. त्यामुळे आमच्याही मनात प्रश्न आहेत की, असे प्रश्न कसे काय पडू शकतात. कारण विलिनीकरणाबाबत ही मंडळी सातत्याने प्रयत्न करत होती. त्यांनी अचानकपणे हा निर्णय का घेतला, याची माहिती मी मुंबईत गेल्यावर घेईन, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्य शशिकांत शिंदे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, आम्ही ही भूमिका का घेतली, तर बात बढेगी तर बहुत दूर तक जायेगी, त्यामुळे आम्ही हा विषय आहे त्या ठिकाणीच थांबवतो, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

एअर इंडियाची इमारत राज्य सरकार खरेदी करणार : मंत्रालयाचे कामकाज नव्या इमारतीतून होणार

नरिमन पॉईंट येथील ‘एअर इंडिया’ची इमारत राज्य सरकार खरेदी करणार असून त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. राज्याच्या वित्त विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई शहर कार्यकारी अभियंत्यांकडे १६०१ कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. निधी उपलब्ध झाल्याने बांधकाम विभागाने खरेदीचा मसुदा तयार करून तो विधी आणि न्यायविभागाकडे मान्यतेसाठी पाठवला आहे. ती मान्यता मिळताच ही खरेदी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.खरेदी प्रक्रिया झाल्यानंतर या इमारतीमधून मंत्रालयाचे कामकाज होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आंब्याचा रस खालल्याने एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा

आंब्याचा रस खालल्याने अहिल्यानगर येथील एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा झाली आहे. यातील सहा जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. एकावर अजूनही उपचार सुरू आहेत. या कुटुंबाने ज्या आंब्याचा रस खाल्ला आहे, ते आंबे कॅल्शियम कार्बईडचा वापर करून पिकविण्यात आल्याची शक्यता डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

डिझेलसाठी शेतकऱ्यांनी पुणे-नागपूर महामार्ग रोखला

पेट्रोल आणि डिझेल हे पंपावर उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पुणे-नागपूर महामार्ग रोखून धरला आहे. शेतकरी हे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत. पूर्वमशागतीसाठी शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्यावे. डिझेल न मिळाल्यास पेरण्या होणार नाहीत, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेंच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत, त्यामुळे दीपके यांच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देण्यात आले. दीपके यांचे कुटुंब सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत आहेत.

शेतकरी आत्महत्या मदतनिधीच्या वाढीबाबत मुख्यमंत्र्यांनी थेट बोलणे टाळले

गेल्या दहा वर्षांत महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महागाई भत्ताही वाढला आहे, पण शेतकरी आत्महत्या मदत निधी मात्र एक लाख रुपयेच आहे, ती वाढविण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या प्रश्नावर यासंदर्भात खूप चर्चा झालेली आहे. त्या संदर्भात आपण विधानसभेत त्या त्या वेळी उत्तरही दिलेले आहे, असे सांगून मदतनिधीत थेट वाढ करण्याबाबत बोलणे टाळले.

Parbhani News : परभणीत इंधनासाठी नागरिकांच्या रांगा; साठेबाजांवर कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

परभणीत मागील काही दिवसांपासून डिझेल टंचाई कायम असून शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. पेट्रोल पंपांवर वाहनांच्या आणि कॅन घेऊन आलेल्या नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. “इंधन बंद होणार का?” तसेच “दर वाढणार का?” अशा चर्चांमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात इंधन साठवण्याचा प्रयत्न करत असल्याने गर्दी वाढल्याचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

Latur Update : मोटेगावकरच्या आरसीसी क्लासवर पुन्हा सीबीआयची चौकशी सुरू

नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयच्या ताब्यात असणाऱ्या प्रा. शिवराज मोटेगावकर याच्या लातूरमधील आरसीसी नालंदा कॅम्पसमध्ये, सीबीआयच्या पथकाने पुन्हा चौकशी केली आहे. मागच्या एक तासापासून हे पथक आरसीसी क्लासमध्ये आहे.

Akola News : भारतीय लष्कराच्या सेंट्रल वेल्फेअर फंडासाठी एक कोटीची देणगी

शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था पाध्ये एज्युकेशनचे संचालक मुकुंद पाध्ये यांनी भारतीय लष्कराच्या सेंट्रल वेल्फेअर फंडासाठी तब्बल एक कोटी रुपयांची देणगी देत देशसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श समाजासमोर ठेवला आहे. 1999 च्या कारगिल युद्धावेळी त्यांनी कोणताही विचार न करता एक लाख रुपये सैनिक कल्याणासाठी अर्पण केले होते.

Buldhana Politics : शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक बंद करा, इंधन टंचाई नसल्याचा दावा खोटा; माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांचा घणाघात

राज्यात डिझेल-पेट्रोल टंचाई नसल्याचा सरकारचा दावा फोल असल्याचा आरोप करत माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आक्रमक पत्र पाठवले आहे. “शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत, शेतीची कामे ठप्प आहेत आणि सरकार मात्र इंधन टंचाई नसल्याचे सांगत जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला. “मुख्यमंत्री कार्यालयात बसून टंचाई नसल्याचे सांगण्यापेक्षा पेट्रोल पंपांवर जाऊन वास्तव पाहावे,” असा टोला देखील त्यांनी लगावला.

Iran And America War : इराण-अमेरिकेमध्ये हा देश घडवणार शांतता करार

आखातामध्ये आमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावामध्ये मध्यस्थीचे पाकिस्तानचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. त्यानंतर आता मध्यस्थीच्या प्रयत्नांमध्ये कतारचा प्रवेश झाला आहे. कतारचं एक शिष्टमंडळ इराणची राजधानी असलेल्या तेहरान इथं पोहोचलं आहे. हे शिष्टमंडळ अमेरिकेसोबत समन्वय साधण्यासाठी इराणसोबत चर्चा करत आहे.

Abhijit dipake home sambhajinagar : अभिजीत दिपकेंच्या घराला हिंगोली पोलिसांनी दिली सुरक्षा

अभिजीत दिपकेंना दोन दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी मिळाल होती, धमकी देणाऱ्याच्या मेसजचा स्क्रिनशॉट ट्विट करत दिपकेंनी ही माहिती दिली. तसेच, सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थन होऊ लागल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोडही उठली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अभिजीत यांच्या आई-वडिलांनी काळजी आणि भीतीही व्यक्त केली. त्यानंतर, आज हिंगोली पोलिसांनी अभिजीत यांच्या घराबाहेर सुरक्षा तैनात केली आहे. पुढील काही दिवस त्याच्या घराला सुरक्षा कायम राहील, असेही पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी यांनी बोलताना सांगितलं.

Oggy vs Cockroach Party : 'कॉकरोच जनता पार्टी'विरुद्ध ‘ऑगी जनता पार्टी’

'कॉकरोच जनता पार्टी'ने इंस्टाग्रामवर तब्बल 2.15 कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार करत प्रस्थापित राजकीय पक्षांना मागे टाकले होते. मात्र, आता या कॉकरोच पक्षाला टक्कर देण्यासाठी सोशल मीडियाच्या मैदानात एका नव्या पक्षाची एन्ट्री झाली आहे, ज्याचे नाव आहे ‘ऑगी जनता पार्टी’ ! हा संपूर्ण ट्रेंड प्रसिद्ध कार्टून शो ‘ऑगी अँड द कॉकरोचेस’ वरून प्रेरित असल्याचे दिसत असून इंटरनेटवर आता 'ऑगी विरुद्ध कॉकरोच' असे युद्ध पेटले आहे.

Gadchiroli Petrol : गडचिरोली जिल्ह्यातील 12 पेट्रोल पंपावर डिझेल नाहीचे फलक

गडचिरोली जिल्ह्यात इंधन टंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, अनेक पेट्रोल पंपांवर “डिझेल नाही” चे फलक झळकत आहेत. जिल्ह्यात एकूण 50 पेट्रोल पंप असून, त्यापैकी 38 पेट्रोल पंपांवर डिझेल आणि पेट्रोलचा साठा उपलब्ध असल्याची माहिती आहे. मात्र उर्वरित 12 पेट्रोल पंपांवर डिझेल संपल्याने वाहनधारक आणि शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

Bachhu Kadu : कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता, मात्र राज्यमंत्रिपद दिले

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ‘मातोश्री’वर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. दरम्यान त्यानंतर आता बच्चू कडू यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. बच्चू कडू यांनी यावेळी बोलताना मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता, मात्र राज्यमंत्रिपद दिलं. माझ्याऐवजी गडाख यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं असा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच गोवाहाटीला जाताना देखील उद्धव ठाकरे यांना मी विचारलं होतं असंही ते म्हणाले आहेत.

पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरच्या रांगा लावू नयेत

मुंबई: जागतिक स्तरावर युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात काही दिवसांपासून इंधन टंचाईची चर्चा असून राज्यातही पेट्रोल पंपांवर याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे. काही ठिकाणी तर गर्दीमुळे हाणामारीचे प्रकारही घडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. राज्यात पेट्रोल-डिझेलची कोणत्याही प्रकारची टंचाई नसून शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपांवर रांगा लावू नयेत, असं भरणे यांनी म्हटलं आहे.

गरीब नगर झोपडपट्टी हटवण्याची मोहीम अखेरच्या टप्प्यात; रेल्वे प्रकल्पाला वेग 

वांद्रे पूर्व येथील गरीब नगर परिसरातील झोपडपट्ट्या हटवण्याची कारवाई आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अतिक्रमण हटवण्याचा आज पाचवा दिवस असून प्रशासनाकडून उर्वरित ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. संपूर्ण परिसर मोकळा झाल्यानंतर येथे रेल्वेच्या महत्त्वाच्या प्रकल्पाला सुरुवात होणार आहे. भविष्यात या ठिकाणी आधुनिक सुविधा असलेला भव्य इंटिग्रेटेड रेल्वे हब उभारण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

विदर्भात उष्णतेचा कहर, तर राज्याच्या काही भागांत वादळी पावसाची हजेरी

महाराष्ट्रात सध्या हवामानात मोठी तफावत पाहायला मिळत आहे. विदर्भातील अनेक भागांमध्ये प्रचंड उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून तापमान तब्बल ४७ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात असेच बदलते वातावरण कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वंदे भारतने शिर्डीकडे प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सार्वजनिक वाहतूक वापरण्याचं आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. आज शिर्डी येथे होणाऱ्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी जाताना त्यांनी सरकारी ताफ्याऐवजी वंदे भारत ट्रेनने प्रवास केला. सावळीविहीर येथे पार पडणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री थेट रेल्वेने शिर्डीत दाखल झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यात बोगस बियाणंचं रॅकेट उघडकीस

नाशिकच्या दिंडोरीत बोगस बियाणे पॅकिंग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.. अक्राळे-जानोरी मार्गावरील पॅकेजिंग इंडस्ट्रीवर पोलिसांनी छापा टाकला असून पाचोऱ्यातील नामांकित सिड्स कंपनीच्या नावाची तब्बल ६ हजार बनावट रिकामी पाकिटे जप्त करण्यात आली आहे.

Mumbai-Pune Expressway Traffic: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बाणेर-म्हाळुंगेजवळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.  

Devendra Fadnvis : देवेंद्र फडणवीस यांचा वंदे भारतमधून प्रवास

शिर्डी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंदे भारतमधून प्रवास केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांचा रेल्वेने शिर्डी येणे पसंत केले. आज शिर्डीत डिफेन्स मॅन्युफॅक्चर क्लस्टरचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची पुन्हा एकदा निवड

रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. 2026 ते 2029 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी शरद पवार हेच रयत शिक्षण (Rayat Shikshan Sanstha) संस्थेचे अध्यक्ष असणार आहेत

विकी सिंग लबानांचे नगरसेवकपद रद्द

उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत पॅनल क्रमांक 6 मधून निवडून आलेले नगरसेवक विकी सिंग लबाना यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समिती, नाशिक यांनी विकी सिंग लबाना यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले.

सात जिल्ह्यात यलो अलर्ट

राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. आज कोकणासह मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवी आहे. सातारा, कोल्हापूरसह 7 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

सुभाष जगताप यांची सुनेत्रा पवारांकडे तक्रार

पुणे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदापासून डावलण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी पक्षाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यांच्या या नाराजीचा फटका पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांना बसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार थेट उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा असलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाचे कार्याध्यक्ष रामदास गाडे पाटील यांनी केली आहे.

दीपके यांची सर्व अकाऊंट हॅक

अभिजित दीपके यांनी ट्विट करत सांगितले की, माझे वैयक्तिक इंस्टाग्राम खाते हॅक झाले. ट्विटरने खाते निलंबित केले. पर्यायी (बॅकअप) खाते देखील बंद करण्यात आले.'Cockroach Janata Party' चे अधिकृत इंस्टाग्राम खाते हॅक करण्यात आले आहे.या खात्याचा ॲक्सेस आता आमच्यासाठी नाही.

अशोक खरातच्या साथीदाराकडून 13.50 कोटी जप्त, ईडीची कारवाई

भोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. मनी लँडरिंग प्रकरणात ईडीने खरातच्या साथीदाराकडून एकाच दिवसात तब्बल 13.50 कोटी जप्त रुपये जप्त केले आहेत. खरातच्या साथीदारांची देखील ED कडून चौकशी सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com