

Mahapalika Election: राज्यातील २९ महापालिकांसाठीचा जाहीर प्रचार आता थांबला आहे. यानंतर १५ जानेवारीला मतदान पार पडणार आहे. पण या महापालिका निवडणुकांची १५ डिसेंबरपासून म्हणजेच २८ दिवसांपासून सुरु असलेल्या आदर्श निवडणूक आचारसंहितेच्या काळात जी काही प्रतिबंधीत कृत्ये झाली त्यावर नेमकी काय कारवाई केली. याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना धक्कादायक माहिती सादर केली आहे.
पत्रकार परिषदेत आयुक्तांना प्रश्न विचारण्यात आला की, महापालिका निवडणुकीत तसंच नगरपालिका निवडणुकांमध्ये पैसे वाटपाचे प्रकार समोर आलेले आहेत. राजकीय लोकांचाच याला पाठिंबा आहे, त्यामुळं येत्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये देखील असा पैसे वाटपांचा प्रकार होऊ शकतो, मग अशा प्रकारांवर निवडणूक आयोग काहीच कारवाई का करत नाही? यावर उत्तर देताना राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले, अशा गैरप्रकारांवर निवडणूक आयोगानं ठोस कारवाई केली नाही असं म्हणणं चुकीचं आहे.
कारण रोख रक्कम, मद्य किंवा काही भेटवस्तू यांचं वाटप रोखण्यासाठी आमच्या सर्व्हिलिअन्स टीम प्रत्येक नाक्यानाक्यावर तैनात केल्या आहेत. तसंच फ्लाईंग स्क्वाड आहेत, व्हिडिओ सर्व्हिलिअन्स टीम आहेत. या सर्व टीमच्या सहकार्यानं प्रत्येक महापालिकेत कमीत कमी सात ते आठ नाके, तितक्याच प्रमाणात फ्लाईंग स्क्वाड आणि तितक्याच प्रमाणात व्हिडिओ विविंग टीम सर्व महापालिकांमध्ये स्थापित झाले आहेत.
या टीमच्यामार्फत, ७ कोटींच्या आसपास रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. २ लाख ३६ हजार लीटर दारु जप्त करण्यात आली आहे, याची एकूण किंमत ५.२८ कोटी रुपये इतकी आहे. तसंच ५४.८५ कोटी रुपयांचे अंमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय शस्त्रास्त्र, स्फोटकं देखील जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये बंदुका, धारदार शस्त्रे, दारुगोळा, चाकू, तलवार, कोयता, फायर आर्म, देसी कट्टा, कार्टिज, काडतुसं, हँड ग्रेनेड, मॅग्झिन अशी ९५ बेकायदा हत्यारं जप्त करण्यात आली आहेत. म्हणजेच जवळपास ६२ कोटींहून अधिक किंमतीचा बेकायदा पदार्थांचा आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
तसंच प्रतिबंधात्मक कारवायांमध्ये 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' या कायद्यांतर्गत २१ हजार १५३ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसंच महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत ३८० लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. MPDA कायद्यांतर्गत ५३ लोकांवर कारवाई झाली, तर मोक्का अंतर्गत १४ लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई झालेली आहे. तसंच ३,१९६ केंद्रे हे संवेदनशील मतदान केंद्रे म्हणून घोषित केली असून तिथं अधिकची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. तसंच आचारसंहिता भंगच्या एकूण ३४१ तक्रारी आलेल्या आहेत, यांपैकी २८० तक्रारींवर कारवाई झाली असून ६१ तक्रारी प्रलंबित आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.