मुंबईतील धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासावरून विरोधकांकडून सातत्याने टीका केली जाते. त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, धारावीकरांचे पुनर्वसन धारावीच करणार आहोत. चांगल्या दर्जाचे घर त्यांना दिले जाईल. अदानी समूह केवळ बांधकामाचं काम करणार आहे. त्यांनी जमीन दिलेली नाही. अपात्र लोकानाही घर दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात महत्वाची माहिती दिली. सूर्यवंशी यांचा मृत्यू सुरूवातीच्या कारणांमध्ये शॉक फॉलोईंग मल्टिपल इन्ज्युरीज असे कारण दिले होते. त्यानंतर हिस्टोपॅथोलॉजीच्या रिपोर्टमध्ये ट्रिपल व्हेसल डिसीजचा गंभीर आजार असल्यामुळे मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. म्हणून ही दोन वेगळी मते आल्याने हे दोन्ही रिपोर्ट जे.जे.शासकीय रुग्णालायत पाठविण्यात आले. आता त्यांनी दिलेल्या रिपोर्टमध्ये सूर्यवंशी यांचा मृत्यू कोरोनरी आर्टरी डिसीज विथ अक्युट कोरोनरी सिंड्रोममुळे झाल्याचे म्हटले आहे. हा निष्कर्ष सरकारने काढलेला आहे. सरकार अजूनही अंतिम निष्कर्षाला आलेले नाही. सरकारने नेमलेल्या आयोगाचा अहवाल आल्यानंतरच अंतिम निष्कर्ष काढला जाईल, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.
महादेव मुंडे प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकरणात १९६ जणांकडे विचारपूस केली आहे. त्यांचा पैशांच्या देवाणघेवाणीवरून कुठे वाद झाला होता का, याबाबत ८३ साक्षीदारांकडे तपास केला आहे. जे काही मोबाईल क्रमांक आहे, त्यातील २८६ जणांकडे तपास केला आहे. ३७ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. व्हिसेरा अहवालाची पुन्हा तपासण करणे चालली आहे. परळीच्या एका जंगलाजवळ एका खुल्या मैदानात हा हल्ला झाला. प्रत्यक्ष साक्षीदार सापडला नाही. पण दीड महिन्याने एका महिलेने ही घटना पाहिल्याचे कळलं. तिने दोन व्यक्ती भांडत असल्याचे सांगितलं. आता जवळपास १५० नंबरचा डम्प डाटा तपासत आहोत. त्यामुळे मी त्यांच्या पत्नीला एवढंच आश्वासत करू इच्छितो की, कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही. यासंदर्भात कारवाई केली जात आहे, असे फडणवीस म्हणाले.
विधिमंडळाच्या अधिवेशनात जनसुरक्षा कायदा मंजूर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यावरून सरकारवर टीका केली होती. कडवे डावे या शब्दांवर ठाकरेंनी आक्षेप घेतला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हा कायदा डाव्यांच्या विरोधात नाही. डावे आणि कडवे डावे यात फरक आहे. सरकारला विरोध करण्यात काहीच चूक नाही. पण देशविघात कृती करणाऱ्याला माफी मिळणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या कायद्यांतर्गत कोणतीही चुकीची कारवाई केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांच्याकडून सातत्याने हनी ट्रॅपचा आरोप केला होता. विधानसभेत त्यांनी हा मुद्दा मांडला होता. आजी-माजी मंत्री, अधिकारी यामध्ये अडकल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला होता. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. अशा कोणत्याही तक्रारी नसल्याचे फडणवीसांनी सांगितले.
"जास्त बोलायला लावू नका. मी शांत आहे, याचा वेगळा अर्थ वेगळा घेऊ नका. कोण किती धुतल्या तांदळाचा आहे, हे मला माहिती आहे. माझ्याकडे डॉक्युमेंट आहे. पण मला सूचना म्हणून मी शातं आहे", असा भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.
'ते एकत्रित पाच जण उभे होते. मला मारायचा प्लॅन होता. परंतु मी त्यांच्या हाताला घावलो नाही. मी परिसरात नव्हतो, नाहीतर माझ्यावर बिल फाडलं असतं. माझ्यासाठी नितीन देशमुखांनी मार खाल्ला. पोलिसांना काहीच माहिती नाही. हल्ला करायला पाच जण होते, अन् एकाला अटक केली जाते. परंतु विधिमंडळत परिसरात झालेल्या कालच्या घटनेबाबत मी अत्यंत खेद व्यक्त करतो', अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
'विधानभवनातील कालची हाणामारीची घटना, काळीमा फासणारी आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करण्यासाठी विधानभवनात गुंड आणले गेले. कायदा-सुव्यवस्थेकडे गांभीर्याने पाहावे. ही स्थिती खराब झाली आहे', असा घणाघात काँग्रेस (Congress) नेते तथा विधिमंडळातील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
"विधिमंडळातील कालची घटना दुर्दैवी असून, त्याची गंभीर दखल विधानसभा अध्यक्षांनी घेतली आहे. विधिमंडळाचे पावित्र सर्वांनीच राखले पाहिजे. यावर विधानसभा अध्यक्ष या घटनेवर कडक कारवाई घेणार असल्याचे संकेत", शिवसेना नेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले.
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये विधिमंडळात झालेल्या मारहाणीवर शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. "काल झालेला प्रकार म्हणजे काळा दिवस आहे. महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावी", अशी त्यांनी मागणी केली आहे.
नंदुरबारमध्ये गाजत असलेल्या जमीन घोटाळाप्रकरणी महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा भाजपचे (BJP) आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधीमुळे नंदुरबार इथल्या भूमाफियांना मोठा दणका बसला आहे. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात नंदुरबार इथले तहसीलदार यांना निलंबित करण्यात आले आहे. डॉ. विजयकुमार गावित यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सभागृहात, या जमीन घोटाळे प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यास एक महिना उशीर केला. त्यामुळे नंदुरबार इथले संबंधित तहसीलदार यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्टला मुंबईत (Mumbai) आरक्षणासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी धाराशिव जिल्ह्यात जोरदार तयारी चालू सुरू आहे. मराठा बांधव गावोगावी रॅलीचे आयोजन करत असून, बैठकांवर जोर देत आहेत. या मोर्चात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन, मराठा आरक्षणाचा लढा देण्यासाठी मुंबईला येण्याचं आवाहन ही केलं जात आहे. मोर्चाच्या काळात गणेश उत्सव असल्याने गणपतीची स्थापना चालत्या वाहनांमध्ये करून गणेशाचं विसर्जन समुद्रात करण्याचे नियोजन केले आहे.
बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरी बँक ऑफ बडोदाचे मुख्य प्रबंधक शिवशंकर मित्रा यांनी गुरूवारी मध्यरात्री बँकेतच (Bank) गळफास घेतला. 'बँकेच्या कामाच्या अतिरिक्त दबावाला कंटाळून आत्महत्या करत आहे, यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, पत्नीला उदेदशून आपल्याला तिने माफ करावे, असेही त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठीमध्ये लिहले.मित्रा यांनी स्वेच्छानिवृत्तीची मागणी केली होती. बँकेच्या कामाचा ताण त्यांना असाह्य झाला होता. शेवटी या ताणाला कंटाळून त्यांनी थेट आत्महत्येचाच निर्णय घेतला. मृत्यूनंतर आपले डोळे दान करावेत, असेही त्यांनी चिठ्ठीमध्ये नमूद केले आहे.
विधानभवन परिसरातील राड्यानंतर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. फेसबूकवर पोस्ट करत त्यांनी म्हटले आहे की, सरकारला पण माझं आव्हान आहे की जर थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर पण कारवाई करून दाखवा. जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही, मग मात्र मुजोर मराठी द्वेष्ट्याना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेंव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका.
विधीमंडळ भवन परिसरात झालेल्या राड्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेपक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
पावसाळी अधिवेशनात आमदार गोपीचंद पडळकर लक्षवेधीवरून दादा भुसे आणि गोपीचंद पडळकर भिडले. पळकर हे आक्रमक झाल्यानंतर दादा भुसे यांनी आपली बाजू विधानसभा अध्यक्षांच्यासमोर मांडत उत्तर दिले.
गोपीचंद पडळकर यांनी आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या मारहाणी बद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले माझ्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जी कारवाई झाली त्याला सामोरे जाऊ. न्यायालयात आम्ही आमची बाजू मांडू.
मीरा भाईंदरमध्ये मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद पेटला होता. या वादानंतर मनसेने तेथे मोर्चा काढला होता. पोलिसांनी या मोर्चाला विरोध केल्याने वातावरण पेटले होते. आता आज (शुक्रवारी) संध्याकाळी राज ठाकरे मीरा-भाईंदरमध्ये सभा घेणार आहेत.
रांगोळी ग्रामपंचायत सदस्य आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार लखन आण्णाप्पा बेनाडे (वय ३१, रा. माळभाग, रांगोळी, हातकणंगले) याचा कर्नाटकातील संकेश्वरजवळ खून झाल्याची घटना उघडकीस आली. लखनचा खून केल्याची कबुली काही संशयितांनी कोल्हापूर पोलिसांसमोर दिल्याची माहिती आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये हल्ला करत त्यांना वंगण लावण्यात आले होते. त्याच्या निषेधार्थ आज (शुक्रवारी) अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली आहे.
विधीमंडळ आवारात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर हल्ला करुन त्यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळं आमदार जितेंद्र आव्हाड साहेब यांच्यासोबत सरकारविरोधात आंदोलन केलं. आरोपीला मोकाट सोडून पीडिताला अटक करणं हे चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार असून सत्तेतून आलेली ही मस्ती आहे.. पण सरकारच्या या जुलमाविरोधात आम्ही लढत राहू, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या इजलकरंजी शहराच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या प्रदेश चिटणीस पदाची जबाबदारी विठ्ठल चोपडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पक्षाच्या इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्षपदावर सुहास जांभळे यांना संधी देण्यात आली आहे. तर बाळासाहेब देशमुख यांची पक्षाच्या सेवा दल विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकर यांनी या तिघांच्या निवडीचे पत्र दिले आहे.
जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा झाला. मात्र, या प्रकरणात महेश चोरमले या ट्विटर अकाऊंटवरून जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा यांच्यावर अश्लिस शेरेबाजी करण्यात आली. या प्रकरणी नताशा यांच्या शेरेबाजीचा स्क्रिनशाॅट ट्विट करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केला आहे. जसा राजा, तशी प्रजा! सगळे गुंडे. या प्रकरणात माझी कोणतीही भूमिका नाही, तरीही या नीच लोकांकडून मला यात ओढले जात आहे. देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलिस तुम्ही फक्त मजा पाहत राहा, असे ट्विटमध्ये नताशा यांनी म्हटले आहे.
जसा राजा, तशी प्रजा! सगळे गुंडे.
— Natasha Awhad (@NatashaASpeaks) July 17, 2025
या प्रकरणात माझी कोणतीही भूमिका नाही, तरीही या नीच लोकांकडून मला यात ओढले जात आहे.@Dev_Fadnavis @MumbaiPolice तुम्ही मजा पाहत राहा फक्त! pic.twitter.com/pG6a1dTYkQ
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.