

Solapur News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. त्यामुळे राज्यभरात जवळपास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यातून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या जवळपास 17 जागा रिक्त आहेत. पहिल्या टप्यात पार पडलेल्या 12 जिल्हा परिषद निवडणुका पार पडताच आता राज्यातील 17 जागा पैकी जवळपास पाच ठिकाणच्या निवडणुका होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तर उर्वरित जागाही 75 टक्के मतदार उपलब्ध असल्यास होऊ शकतात, असे निवडणूक आयोगातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवडणुकीची घोषणा होणार असल्याने हालचालींना वेग आला आहे.
त्यातच सोलापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लवकरच होणार असून त्यामुळे आता इच्छुकांत जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. या रिक्त जागेवर भाजपचे संख्याबळ मोठे असल्याने याठिकाणी त्यांच्या कोट्यातून येत्या काळात कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे.
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेवर गेल्या निवडणुकीचा अपवाद वगळता आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. त्यानंतरच्या राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणानुसार भाजपने (BJP) येथे विजय मिळवत वर्चस्व ठेवले आहे. त्यामुळे येत्या काळात उमेदवार कोण असणार यावरून उत्सुकता लागली आहे.
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या मतदार संघातून २००४-२०१० च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून दिलीपराव माने विजयी झाले होते. त्यानंतर २०१०-२०१६ या कालावधीत दीपक साळुंखे यांचे वर्चस्व होते. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक साळुंखे-पाटील यांनी या जागेवर बाजी मारली. त्यानंतर २०१६ च्या निवडणुकीत मात्र सोलापूरचे राजकीय समीकरण बदलले. भाजपचे प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादीच्या दीपक साळुंखे यांचा पराभव करत हा गड भाजपकडे खेचून आणला.
त्यामुळे आता आगामी काळात भाजपकडून कोणाला संधी दिली जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. या जागेसाठी माजी आमदार प्रशांत पारिचारक पुन्हा इच्छुक आहेत. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलेले माजी आमदार राजेंद्र राऊत, राम सातपुते नव्याने भाजपमध्ये आलेले राजन पाटील, दिलीप माने यांच्या नावाची चर्चा जोरात सुरु आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाकडून अनेक जण इच्छुक असल्याचे समजते.
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यावर भाजपचे एकहाती वर्चस्व ठेवण्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यांनी स्थानिकच्या निवडणुकीपूर्वीच स्वपक्षातील नेनेटमंडळीचा विरोध पत्करून विरोधी पक्षातील आमदारांना भाजपमध्ये संधी देत निवडणुकीपूर्वीच साखर पेरणी केली होती. माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, बबनदादा शिंदे यांचे चिरंजीवाना प्रवेश देत डाव टाकला होता. त्यामुळे स्थानिकाच्या निवडणुकीवर भाजपचे एकहाती वर्चस्व पाहवयास मिळाले. त्यामुळे भाजपचा विधान परिषदेचा उमेदवार ठरवताना पालकमंत्री गोरे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक येत्या काळात लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरु झाली असून या निवडणुकीसाठी एकूण ५०१ सदस्य मतदान करणार आहेत. त्यामध्ये महायुतीमधील भाजप २६२, एकनाथ शिंदे यांची शिवसेना ७१, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष ४७ असे महायुतीचे एकूण ३८० सदस्य आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंची शिवसेना २७, काँग्रेस १९, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ३४ असे एकूण ७० संख्याबळ आहे. त्याशिवाय अपक्ष ४ तर स्थानिक आघाडीचे ४७ सदस्य आहेत. त्यामुळे या जागेवर महायुतीचा उमेदवार विजयी होणार आहे. विशेषतः भाजपचे संख्याबळ मोठे असल्याने भाजप इतर पक्षांना जागा सोडण्याची संधी कमी आहे. त्यामुळे उमेदवार काळ असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोलापूर जिल्हा परिषद महायुतीच्या ताब्यात
सोलापूर जिल्हा परिषदेत ६८ सदस्य असून या ठिकाणी भाजपला बहुमत आहे. भाजप 38, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष ११, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष 5, शिवसेना एकनाथ शिंदे 8, शेकाप 3, करमाळा स्थानिक आघाडी 2, तीर्थक्षेत्र विकास आघाडी 1 असे पक्षीय बलाबल आहे. तर पंचायत समितीच्या ११ सभापतींना या निवडणुकीत मतदानाचा हक्क असणार आहे. त्यामुळे ११ पैकी १० सभापती हे भाजपचे आहेत तर एक सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे.
सोलापूर महापालिकेवर भाजपचे वर्चस्व
सोलापूर महापालिकेत एकूण १०२ सदस्य असून त्यापैकी भाजपचे ८७, एमआयएम ८, एकनाथ शिंदे शिवसेना ४, काँग्रेस २, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा एक सदस्य निवडून आला आहे. त्यामुळे याठिकाणी देखील भाजपचे प्राबल्य आहे.
जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतीमधील पक्षीय बलाबल
सोलापूर जिल्ह्यात माढा, माळशिरस, अनगर, श्रीपूर-महाळुंग, वैराग आणि नातेपुते या एकूण ६ ठिकाणी नगरपंचायती कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त जिल्ह्यात ११ ठिकाणी नगरपरिषदा कार्यरत आहेत, ज्यामध्ये बार्शी, पंढरपूर, करमाळा, सांगोला, अक्कलकोट, मंगळवेढा, मैंदर्गी, दुधनी, कुर्डुवाडी, अकलूज आणि मोहोळ यांचा समावेश आहे. या ठिकाणचे पक्षीय बलाबल पुढीलप्रमाणे आहे.
सोलापूर जिल्हयात ११ नगरपालिका व ६ नगरपंचायती असून याठिकाणी एकूण सदस्य संख्या ३४९ इतकी आहे. त्यामध्ये पक्षानुसार भाजप १३७, एकनाथ शिंदे यांची शिवसेना ५९, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ३४ असे एकत्रित महायुतीचे २३० इतके संख्याबळ आहे तर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांची शिवसेना २७, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस २९, काँग्रेस १७ असे एकत्रित आघाडीचे संख्याबळ ७३ इतके आहे. त्याशिवाय स्थानिक आघाडीचे ४२ तर अपक्षांची संख्या ४ इतकी आहे. एकंदरीतच ही सर्व आकडेवारी पाहता आगामी काळात होत असलेल्या या निवडणुकीत भाजपचा वरचष्मा असणार आहे.